कारभारणीच्या सरपंचपदासाठी ‘वाट्टेल ते’
By Admin | Updated: August 22, 2015 01:27 IST2015-08-22T01:27:52+5:302015-08-22T01:27:52+5:30
जिल्ह्यात झालेल्या ६२८ ग्रामपंचाययतीचे निकाल ६ आॅगस्टला लागले. त्यानंतर आता सरपंच पदाचे वेध संभावित उमेदवारांना लागले आहेत.

कारभारणीच्या सरपंचपदासाठी ‘वाट्टेल ते’
बहुमतासाठी पतीकडून पैशाचा पाऊस : देवदर्शनासह पर्यटनवारीची तयारी
राजकुमार चुनारकर खडसंगी
जिल्ह्यात झालेल्या ६२८ ग्रामपंचाययतीचे निकाल ६ आॅगस्टला लागले. त्यानंतर आता सरपंच पदाचे वेध संभावित उमेदवारांना लागले आहेत. सरपंच पद महिला राखीव असलेल्या गावातील नेत्यांनी निवडणुकी आधीच या पदासाठी ‘फिल्डींग’ लावली होती. आता विजयी झालेल्या आपल्या कारभारणीलाच गावचे सरपंच करण्याचा चंग पतीराजाने बांधला आहे. पद घरातच ठेवण्यासाठी ‘वाट्टेल ते’ करण्याची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र सध्या चिमूर तालुक्यात दिसत आहे.
मागील महिन्यात आकाशातून पाऊस बरसणे कमी होते. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. आता काही प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी बळीराजाची चिंता थांबली नाही. मात्र ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांवर कारभारणीच सरपंच व्हावी, यासाठी पैशाचा पाऊस पडू लागल्याचे चित्र काही गावात दिसू लागले आहे. काही झाले तरी आपली पत्नी सरपंच होणे गरजेचे असल्याचे गाव पुढारी बोलत आहेत. ती सरपंच झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पण करीत अनेक पतीराजाची ‘वाट्टेल ते’ करण्याचे ठाणले आहे.
आमदारकीच्या निवडणुकीत स्पर्धा कमी पहायला मिळते. पण सध्यातरी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ही स्पर्धा तीव्र असल्याचे पहायला मिळत आहे. काही गावात आपण आमदार साहेबांच्या किती जवळचे आहोत. त्यांचा निधी आपल्या गावाला कसा येईल, अशी आश्वासने देण्यास सध्या गाव पुढारी गुंतल्याचे त्यांच्या हालचालीवरुन दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता गावोगावी विजयी पार्टीच्या माध्यमातून सदस्यांना जुळवणे सुरू झाले आहे. प्रत्येकालाच सरपंच निवडीचे वेध लागले आहेत.
सरपंचपद आपल्या घरातच आले पाहिजे. या भूमिकेवर ठाम मत असल्याने ‘वाट्टेल ते’ करुन पद पदरात पाडून घेण्यासाठी गाव पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे. आणि होणाऱ्या खर्च पाहून घेऊ, हा मंत्र घेऊन कुणी देवदर्शन तर काही पर्यटनाचे आमिष दाखविण्यात गुंतले आहेत.सरपंच पदासाठी लागणारा ‘जादुई आकडा’ गाठण्यासाठी कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्ह्यातील आमदार मंडळी आपल्या पक्षाच्या किती ग्रामपंचायतीचे सरपंच येणार, यासाठी सरसावले आहेत. सरपंचपद आपल्या पक्षाचे असावे, यासाठीही मात्तबर नेते कामाला लागले आहे.