शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला
By Admin | Updated: October 19, 2015 01:37 IST2015-10-19T01:37:55+5:302015-10-19T01:37:55+5:30
बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या निस्तारण्यासाठी कोठारीत शिवसेनेने मोर्चा काढून बल्लारपूरचे नायब तहसीलदार चंद्रभान वंजारी ...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला
शिवसेनेचे नेतृत्व : शासनाचे वेधले लक्ष
कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या निस्तारण्यासाठी कोठारीत शिवसेनेने मोर्चा काढून बल्लारपूरचे नायब तहसीलदार चंद्रभान वंजारी यांच्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले.
काटवली ग्रामपंचायतीत समाविष्ठ असणाऱ्या दारिद्र रेषेखालील कुटूंबांना नवीन संगणकीय दाखले देण्यात आले. मात्र त्यात शेकडो गरीब कुटुंबांना डावलण्यात आले. वंचित कुटुंबांचा समावेश पुन्हा बीपीएल यादीत करावा, सन २०१४-१५ अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान शासन वितरित करीत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे बँक पासबुक क्रमांक, तलाठी, ग्रामपंचायती व कृषी सहाय्यकांकडे देण्यात आले. मात्र बँकेत अनुदान जमा होत नाही. अनेकवेळा तहसील कार्यालयात शेतकरी चकरा मारत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नाही. शेतकऱ्यांचे अनुदान बँकेत त्वरीत जमा करण्यात यावे, नैसर्गिक संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून शेतीवरील रोगांचा प्रार्दूभाव दूर करण्याकरीता सहकार्य मिळत नाही. कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी दुकानदाराने दिलेल्या औषधांचा भरमसाठ पैसे खर्च करून खरेदी करण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना तीळमात्र उपयोग होत नाही. शेतकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अनेक वर्षापासून कुटुंबाच्या उदर निर्वाहाकरीता अतिक्रमण करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत पट्टे देण्यात यावे. पट्टे वितरणातील शासनाने जाचक अटी रद्द करून पट्यासाठी त्रस्त शेतकऱ्यांना पट्टे वाटपाची कारवाई करावी, कोठारी, काटवली, खामतुर्ली, ह्या शेती पट्ट्यात सोयाबीन, धान, कापूस यासह अनेक खरीपाची पिके घेतली जातात. तरीही शासनाच्या दप्तरात त्या क्षेत्राची रब्बी पिकांचे गाव म्हणून नोंद आहे. ही नोंद रद्द करून खरीपाची गावे म्हणून नोंद घेण्यात यावी.कोठारी परिसरातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाची व्यवस्था नाही. तरी जिवंत नाल्यावर बंधारे बांधून पाणी अडवून शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा. औषधी, खते, बियाणे यावर सरकार विक्री मूल्य निर्धारित असते. मग शेतकऱ्यांना त्यांच्या पिकावर आधारित शेतमालास हमी भाव देण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
मोर्चात सोमेश्वर पद्मगिरवार, बल्लारपूर न.प. माजी उपाध्यक्ष सिक्की यादव, बल्लारपूर शिवसेना तालुका प्रमुख कमलेश शउक्ला यांच्या नेतृत्वात महिपालसिंग टेकडीवरून प्रचंड घोषणाबाजी करीत मोर्चा नायब तहसील कार्यालयाच्या पटांगणावर निवेदन देवून विसर्जीत करण्यात आला. त्यात साईनाथ आदे, सुरेश वाढगुरे, रूपेश चौधरी, विश्वास राजुरकर, शैलेश रामटेके, महादेव लोणारे व नानाजी मडावी यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. मोर्चात कोठारीसह कवडजई, पळसगाव, मानोरी, इटोली, काटवली, बामणी, आमडी आदी गावातील शेतकरी सहभागी झाले. (वार्ताहर)