मतदार यादीप्रमाणे लसीकरण केंद्र जोडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST2021-04-02T05:00:00+5:302021-04-02T05:00:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे ...

मतदार यादीप्रमाणे लसीकरण केंद्र जोडावे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे व्हावे. यासाठी शहर व गावातील प्रत्येक वार्डाला मतदान यादीप्रमाणे लसीकरण केंद्र जोडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज कोरोना टास्क समितीची बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, जिल्ह्यात सध्या ८१ लसीकरण केंद्र सुरू आहेत. लस उपलब्ध झाल्यावर लगेचच २०० लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल. कोरोना रूग्णांसाठी सर्व ऑक्सिजन बेडवर अखंडित ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध आहे का, याबाबत खात्री करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, डॉ. प्रतीक बोरकर, डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. गणेश धोटे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंतच
जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडित हॉस्पीटल, दवाखाने, मेडीकल, पॅथॉलॉजी, रक्तपेढी व तत्सम आस्थापना वगळता सर्व दुकाने, आस्थापना, मार्केट दररोज सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.नवीन नियमावलीनुसार रेस्टॉरंट व हॉटेल बैठक क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांच्या उपस्थित सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहतील. तसेच त्यांना रात्री ११ वाजेपर्यंत घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी कमी होण्याच्या दृष्टीकोनातून लोकप्रतिनीधी व्यतिरिक्त इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय परवानगी दिली जाऊ नये. सर्व धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाने जागेच्या उपलब्धतेनुसार एका तासाकरिता प्रवेश देण्यात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या निश्चित करावे लागणार आहे.