जिल्ह्यात अवकाळी पावसाने वातावरणात गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST2021-02-20T05:21:31+5:302021-02-20T05:21:31+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.गोंडपिपरी तालुक्यातील धाबा-तोहोगाव परिसरात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी वादळी ...

जिल्ह्यात अवकाळी पावसाने वातावरणात गारवा
चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वत्र गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.गोंडपिपरी तालुक्यातील धाबा-तोहोगाव परिसरात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी वादळी पाऊस पडला. त्यामुळे रबी पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. चंद्रपूर शहरात हलक्या सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने पाच दिवसांपूर्वीच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. दरम्यान, आज गोेंडपिपरी, राजुरा, जिवती, कोरपना, भद्रावती, चंद्रपूर तालुक्यात सायंकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा, तोहोगाव, लाठी, सरांडी परिसरात अवकाळी वादळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रबी हंगामातील हरभरा, मिरची, गहू व अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भद्रावती तालुक्यातील कोंढा परिसरातही हलका पाऊस पडला. शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार पिकांचे नियोजन करावे, काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे. शेतकऱ्यांनी झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली तसेच वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आश्रय घेऊ नये, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.