पॅसेंजर बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:48+5:302021-03-08T04:26:48+5:30
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हापासून रेल्वेची ...

पॅसेंजर बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तेव्हापासून रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मधल्या काळात शिथिलता मिळाली. त्यामुळे काही रेल्वे सुरू करून प्रवाशांना दिलासा देण्यात आला. मात्र, पॅसेंजर अद्यापही बंदच आहे. त्यातच आता कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे या रेल्वे सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी, नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करून प्रवास करावा लागत आहे.
चंद्रपूर, तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे थांबतात. मात्र, आता काही विशेष गाड्यांशिवाय अन्य रेल्वे धावतच नसल्याने, रेल्वे स्थानकावरही आता शुकशुकाट बघायला मिळत आहे. विशेषत: बल्लारपूर येथून बल्लारशा-गोंदिया, बल्लारशहा-वर्धा या पॅसेंजर धावतात. मात्र, लाॅकडऊनपासून या रेल्वे गाड्या बंद आहे. परिणामी, अनेकांचा रोजगारही बुडाला आहे. पॅसेंजर बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे नुकसान होत आहे. या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी आता रेल्वे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्यातरी पॅसेंजर सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.
मागील मार्च महिन्यापासून बल्लारपूर-गोंदिया, तसेच बल्लारपूर वर्धा ही पॅसेंजर बंद आहे. परिणामी, या मागार्वरील दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसत आहे. बसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नाहक आर्थिक फटका बसत आहे.
बल्लारशहा-गोंदिया, बल्लारशहा-वर्धा या प्रवासासाठी पॅसेंजर गाडी आहे. मात्र, त्या बंद असल्यामुळे प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी ४०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.