बेरोजगारीमुळे विद्यार्थी नैराश्यतेच्या खाईत
By Admin | Updated: August 15, 2015 01:22 IST2015-08-15T01:22:02+5:302015-08-15T01:22:02+5:30
दरवर्षी कितीतरी तरूण-तरुणी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असताना त्यांच्या नोकरीचा प्रश्न बिकट होत आहे.

बेरोजगारीमुळे विद्यार्थी नैराश्यतेच्या खाईत
गुंजेवाही : दरवर्षी कितीतरी तरूण-तरुणी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असताना त्यांच्या नोकरीचा प्रश्न बिकट होत आहे. नोकरीसाठी आलेले अपशय आणि एक बेरोजगाराच जीवन जगणाऱ्या या युवा पिढीला ही बेरोजगारी नैराश्येच्या खाईत लोटत असल्याचे चित्र आता जागोजागी पाहावयास मिळत आहे.
कित्येक युवक-युवती आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी मनात एक सुप्त इच्छा बाळगून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला हवी तशी नोकरी मिळेल, अशी सर्वांना आशा असते. पण त्यावेळी चित्र हे उलटेच असते. कोणत्याही ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यानुसार ुमुलाखत दिली तर ‘कळवू’ असा शेरा त्यांना मिळतो आणि कधीच त्यांना कळविले जात नाही. नोकरीच्या शोधात असे कितीतरी वर्ष निघून जातात. पण नोकरी नसल्याने आणि पाहिजे तसा व्यवसाय नसल्याने आजच्या तरुणांना नशिबी नैराश्य येत आहे. आजुबाजुला नजर टाकली तर असे चित्र दिसून येईल की, ज्यांच्या जवळ पैसा किंवा ओळख अशानाच नोकरीची संधी मिळते. सरकारी कार्यालय असो की, शिक्षण संस्था त्या आर्थिक व्यवहारातच गुंतलेल्या दिसतात. बेरोजगार युवक मोठ्या आशेने शिक्षण घेतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुत आहे, ते पैशाअभावी नोकरीपासून दूर आहेत. ही खेदाची बाब आहे. यातून आजच्या तरुण पिढीला एक नैराश्य येत आहे. याचा विपरित परिणाम होऊन काही तरुण वाईट मार्गाला लागत आहे. मिळेल त्या ठिकाणी अवैध धंदे करून आता पैसा मिळविण्याकडे त्यांचा कल आहे. परिस्थितीपुढे ते शरण होत आहे. त्यात त्यांचा काय दोष? आजच्या युवा पिढीवर उद्या या देशाचे भविष्य अवलंबून आहे. पण ही युवा पिढी अशी नैराश्येच्या गर्तेत खोल ढकलली जात असल्याने पुढे देशाचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासाठी शासनाने बेरोजगार तरुणांसाठी काहीतरी ठोस योजना आखल्या पाहिजे. जेणेकरून युवकांनी घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून आपला रोजगार मिळवू शकतील. ग्रामीण आणि शहरातही बेरोजगार वाढले असून दारू, सट्टा यासारख्या वाईट व्यसनाच्या मार्गाला लागून स्वत:चे जीवन उद्धवस्त करीत आहेत. दरवर्षी विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. पण त्यांना उपयुक्त रोजगार मिळत नाही. त्यांच्या हाताला हवा तसा रोजगार उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने शासनाचे नियोजन हवे. (वार्ताहर)