अल्टिमेट संपला; २४ तासांत पाणीपुरवठा होणार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST2021-03-22T05:00:00+5:302021-03-22T05:00:37+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी आर्थिक अडचणीमुळे सामान्य ग्राहकांनी तब्बल आठ ते दहा महिन्यांचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सुरू केल्यानंतर वीज बंद होईल, या भीतीने अनेकांनी बिल भरले. मात्र गावागावांतील पाणीपुरवठा योजनेतील वीजबिल भरण्यास संबंधितानी दुर्लक्ष केले आहे.

अल्टिमेट संपला; २४ तासांत पाणीपुरवठा होणार ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील बहुतांश पाणीपुरवठा योजना, पथदिवे तसेच शासकीय कार्यालयातील वीजबिल भरण्यातच आले नाही. दरम्यान, महावितरणचा प्रथम १५ दिवसांचा नोटीस कालावधी संपला असून, आता केवळ २४ तासांचा अल्टिमेट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील २४ तासांमध्ये गावागावांतील पाणीपुरवठा ठप्प पडणार असून, पथदिव्यांची तसेच शासकीय कार्यालयातील वीजपुरवठा कट केला जाणार आहे. विशेषत: चंद्रपूर तसेच वरोरा तालुक्यात प्रथम कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी आर्थिक अडचणीमुळे सामान्य ग्राहकांनी तब्बल आठ ते दहा महिन्यांचे वीजबिल भरले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे सुरू केल्यानंतर वीज बंद होईल, या भीतीने अनेकांनी बिल भरले. मात्र गावागावांतील पाणीपुरवठा योजनेतील वीजबिल भरण्यास संबंधितानी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता हे बिल कोट्यवधींच्या घरात पोहोचले आहे. परिणामी महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळणे कठीण झाले असून, वसुलीशिवाय पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे कठोर पाऊल उचलणे सुरू केले आहे. यासाठी प्रथम सामान्य ग्राहकांना टार्गेट केल्यानंतर आता पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालय तसेच गावागावांतील पथदिव्यांचे वीजबिल भरले नाही. त्यांच्याकडे आता महावितरणे लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार या कार्यालयाना प्रथम १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मात्र या मुदतीतही अनेकांनी दुर्लक्ष केले.
आता हा मुदत कालावधी संपला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करून महावितरणे २४ तासांचा अल्टिमेट दिला आहे. २४ तासांमध्ये वीजबिल न भरल्यास संबंधित विभागाचा वीजपुरवठा कट होणार आहे. परिणामी सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, काही शासकीय रुग्णालयाचाही यामध्ये समावेश आहे.
१३७.२९ लाख रुपयांची थकबाकी
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी अशी एकूण १७३ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती ५८ कोटी १४ लाख, वाणिज्यिक ११ कोटी ३८ लाख, औद्योगिक पाच कोटी ५१ लाख रुपये थकबाकी आहे.
पाणीपुरवठा थकबाकी
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेचा चार कोटी २७ लाख, तर सरकारी कार्यालये व इतर लघुदाब ग्राहकांकडे चार कोटी ७८ लाख, शहरी व ग्रामीण पथदिव्यांच्या वीजबिलापोटी दोन्ही जिल्ह्यातील नगरपालिकांकडे व ग्रामपंचायती असे एकूण ५२ कोटी ७२ लाख वसुली होणे बाकी आहे.