जडवाहतुकीचे आणखी दोन बळी
By Admin | Updated: April 26, 2015 01:45 IST2015-04-26T01:45:18+5:302015-04-26T01:45:18+5:30
गडचांदुरात अपघाताची मालिका सुरूच असून माणिकगड सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज शनिवारी झालेल्या आणखी एका अपघातात...

जडवाहतुकीचे आणखी दोन बळी
गडचांदूर : गडचांदुरात अपघाताची मालिका सुरूच असून माणिकगड सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज शनिवारी झालेल्या आणखी एका अपघातात एकाचा जागीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृताच्या नातेवाईकांना मोबदला देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. जडवाहतूक व वाहनांच्या वाट्टेल तिथे होणाऱ्या पार्र्कींगमुळे आणखी किती जणाचे बळी जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नंदकिशोर नारायण आत्राम (२७) रा. चंदनवाही व सुनील यादव केळझळकर (२६) रा. पिंपळगाव अशी मृतांची नावे आहेत. सुनिल केळझळकर हा येथील एका वाहन दुरुस्तीच्या दुकानात काम करतो. दुकानाची चावी आणण्याकरिता मालकाच्या घरी दुचाकीने (एम.एच.३४ एक्स ४०३९) निघाला. माणिकगड कंपनीच्या रस्त्यावर रस्ता ओलांडताना ट्रकने (एम.एच.३१ सी.क्यू. ५८०३) दुचाकीला धडक दिली. यात नंदकिशोर नारायण आत्राम याचा जागीच मृत्यू झाला तर सुनिल गंभीर जखमी झाला. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ट्रकचालक अपघात होताच घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन वाहने ताब्यात घेतली. ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)