बिबट्याने पाडला दोन शेळ्यांचा फडशा
By Admin | Updated: October 18, 2015 01:00 IST2015-10-18T01:00:22+5:302015-10-18T01:00:22+5:30
सावली तालुक्यातील खेडी गावात बिबट्याने पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री सहा फुटाच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेऊन ...

बिबट्याने पाडला दोन शेळ्यांचा फडशा
खेडी गावातील घटना : नागरिक दहशतीत
सावली : सावली तालुक्यातील खेडी गावात बिबट्याने पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री सहा फुटाच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेऊन बांबूच्या ताटव्यात बांधून असलेल्या शेळ्याचा फडशा पाडला. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सादागड बिटातंर्गत येणाऱ्या खेडी येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून दोन शेळ्या फस्त केल्या. गणेश रामा कंचावार असे शेळी मालकाचे नाव आहे. जि.प. शाळेजवळ या शेळ्याचा गोठा आहे. ५ ते ६ शेळी मालक मिळून या ठिकाणी शेळ्या एकत्र ठेवत असतात. शाळेला लागुनच ग्रामपंचायतीची नर्सरी आहे. रात्रीच्या वेळात हा परिसर शांतच असतो. या परिसराला लागुनच अनेकांची धान शेती आहे. खेडी गावाशेजारी दोन ते तीन कि.मी. अंतरावर आसोलामेंढा नहराला लागून १०८ एकर जागेत सुबाभुळचे खासगी वन आहे. बिबट लपून बसण्याकरिता सोयीची जागा आहे. दिवसभर राहून बिबट रात्रीच्या वेळात गावात प्रवेश करून पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत आहे.
आठ दिवसाअगोदर मध्यरात्री सुखरू कंकलवार यांच्या २१ शेळ्या बिबट्याने ठाक मारल्या होत्या. बिबटसारखे हिंस्त्र प्राणी गावात येऊ लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. (तालुका प्रतिनिधी)
बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी
ब्रह्मपुरी : तालुक्यातील खरकाडा येथे शनिवारी दुपारी महिला शेतावर शेतकाम करीत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. यात मीरा अशोक दिघोरे ही महिला जखमी झाली. महिन्याभरापूर्वी खरफाडा येथे बिबट्याने धुमाकूळ घालून वनविभागाला व गावकऱ्यांना गुंगारा देत पलायन केले होते. वनविभागाने रात्रभर रेस्कू आॅपरेशन सुरू ठेवूनही बिबट्या गळाला लागला नव्हता. वैनगंगेच्या नदीकिनारी दगडाच्या कप्पीत बिबट्याने आश्रय घेतला होता. पहाटेच्या दरम्यान तो पळून गेल्याचे वन विभागाने जाहीर केले होते. परंतु शनिवारी सकाळी ११ वाजता मिरा अशोक दिघोरे ही महिला शेतमध्ये शेतकाम करीत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला. तिने आरडाओरड केल्याने बिबट पळून गेला. त्यानंतर हल्ल्यात जखमी महिलेला खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मागीलवेळी बिबट्याला पकडण्यात वनविभाग अपयशी झाल्याने पुन्हा त्याच बिबट्याने हल्ला केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. बिबट्याच्या दुसऱ्यांंदा झालेल्या हल्ल्याने खरफाडासह आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरलेली असून बिबट्याला पकडण्याची मागणी करण्यात येत आहे.