नांदा येथील पुलाअभावी शेतकऱ्यांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:11+5:302021-07-07T04:35:11+5:30
नांदा ते आसन, कोरपना असा तालुक्याला जोडणारा हा रस्ता असून, अद्यापही झालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यावर ...

नांदा येथील पुलाअभावी शेतकऱ्यांना त्रास
नांदा ते आसन, कोरपना असा तालुक्याला जोडणारा हा रस्ता असून, अद्यापही झालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नाल्यावर पुलांची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांना पलीकडे पावसात बी-बियाणे, खते, कीटकनाशके वाहून नेण्याकरिता चिखलातून मार्ग काढावा लागतो. याचबरोबर, नाल्याची रुंदी मोठी असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाहते. पुरात यापूर्वी अनेक जनावरे वाहून गेल्याची चित्र आहे. पुलावरून शेतकरी कामगार, तसेच विद्यार्थी सतत ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर पुलाची नितांत गरज आहे. याचा फायदा नांदा, बीबी, आवारपूर, नोकरी, पालगाव, आसन, लालगुडा, नवेगाव आदी गावांना होईल. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांना कमी वाहतूक खर्च लागेल व वेळेचीही बचत होईल. पुलाची लांबी जवळपास ७० मीटर असून, साधारणत: दोन कोटींहून अधिक रुपये या पुलासाठी खर्च येणार असल्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. याच बरोबर राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी या नाल्याची पाहणी केली असून, पुलासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे.