शेतकऱ्यांच्या दारातले झाड आता पैशाचे !
By Admin | Updated: January 1, 2015 22:59 IST2015-01-01T22:59:02+5:302015-01-01T22:59:02+5:30
शेतात पैशाचे झाड लागले असते तर किती बरे झाले असते, हे वाक्य हमखास ऐकायला मिळते. मात्र, असे झाड काही लागत नाही आणि पैसे काही मिळत नाही; पण आता शेतकऱ्यांसाठी त्यांच्या दारातील झाड पैशाचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या दारातले झाड आता पैशाचे !
शासन उपक्रम : जपणुकीसाठी मिळणार पैसे
चंद्रपूर : शेतात पैशाचे झाड लागले असते तर किती बरे झाले असते, हे वाक्य हमखास ऐकायला मिळते. मात्र, असे झाड काही लागत नाही आणि पैसे काही मिळत नाही; पण आता शेतकऱ्यांसाठी त्यांच्या दारातील झाड पैशाचे ठरणार आहे.
पैशाचे झाड तोडू नये यासाठी सरकारच या झाडाचा सांभाळ करण्याचे पैसे शेतकऱ्यांना देणार आहेत. यासंदर्भात लवकरच निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी नव्या वर्षात होणार आहे. शेतातील झाड हे वैभवच. पण अनेकदा शेताचे हिस्से होतात. ज्याच्या वाट्याला झाड आले त्याच्याकडून गरज म्हणून त्या झाडांची कत्तल ठरलेलीच असते. अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना याच झाडांचा आधार असतो.
नेमकी वेळ साधून कमी पैशात झाडे तोडून नेणाऱ्या व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळ्याही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. त्याचे सरकारी अधिकाऱ्यांशी लागेबांधे असतात. या जोरावर मग आवाज बंद करून शेतकऱ्यांची लूट केली जाते. या झाडांची कत्तल होऊ नये व त्यांची जपणूक व्हावी यासाठी शेतकऱ्यांना काही प्रोत्साहनपर रक्कम शासन देणार आहे. दारात, शिवारातील उभे झाड पैसे देणारे झाड असल्यामुळे त्याचा सांभाळ उत्तम प्रकारे होऊन पर्यावरणाचा ढासळणारा समतोल राखण्यासाठी त्याची मदत होणार आहे.
झाड किती वर्षांचे आहे, यासह अन्य तांत्रिक बाजूची नोंदणी करून प्रत्येक झाडामागे शेतकऱ्यांना थेट पैसे देण्याचा विचार शासनस्तरावरुन सुरू आहे. शतकोटी वृक्ष लागवडीसारखे उपक्रम सरकारने हाती घेतले. मात्र रोज होणारी वृक्षतोड आणि वृक्ष लागवडीत आलेले अपयश यांचा विचार करता, तिचं झाडे कशाप्रकारे जगवता येतील याचा विचार प्राधान्याने पुढे आला. नव्याने झाडे लावली पाहिजेत. लागलेले झाड जगविण्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यातूनच मग उभ्या झाडाला प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा विचार शासन पातळीवर पुढे आला आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब होताच अंमलबजावणी केली जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)