महामंडळाच्या भंगार, अस्वच्छ बसमधून प्रवास
By Admin | Updated: May 23, 2015 01:32 IST2015-05-23T01:32:41+5:302015-05-23T01:32:41+5:30
बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात ब्रह्मपुरी आगार अपयशी ठरले आहे.

महामंडळाच्या भंगार, अस्वच्छ बसमधून प्रवास
सिंदेवाही: बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य पूर्ण करण्यात ब्रह्मपुरी आगार अपयशी ठरले आहे. ग्रामीण व शहरी भागाची लोकवाहिनी असलेल्या एसटीची गती काळाच्या ओघात मंदावली असून प्रवाशांची दारोमदार खासगी वाहतुकीवरच आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक फोफावली आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद असल्याच्या एसटीची दिवसेंदिवस दुरवस्था कमालीची वाढत आहे. ग्रामीण भागात बसेस वेळेवर सुटत नाही. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी त्या वेळेवर पोहचत नाही. तालुक्याचा आगार ब्रह्मपुरी आहे. जिल्ह्यात चंद्रपूरनंतर ब्रह्मपुरी हाच सर्वात मोठे आगार आहे. या आगारातून अनेक गाड्या भंगार झाल्या असून त्यांना नवीन गाड्यांची प्रतीक्षा आहे. एसटीला लोकाभिमुख करण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. ग्राहकांना अभिवादन करण्याचीही योजना सुरू केली होती. एसटीचे उत्पन्न वाढावे म्हणून अनेक योजना सुरू करण्यात आल्या. पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज झाली नाही. एसटी वाहकांकडून प्रवाशांना अनेकदा अपमानस्पद वागणूक मिळत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यांनाही याबाबत वरिष्ठांकडून सूचना देण्याची गरज आहे. सहकाऱ्यांमध्ये सूचनांंनी सुधारणा होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बसमधील आसनांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. एसटीत धूळ, कागदाचे चिटोरे, प्लास्टिक पिशव्या असतात. मात्र एसटीच्या स्वच्छतेकडे व्यवस्थापकांचे दुर्लक्ष असते. याकडे लक्ष पुरविणे अधिकाऱ्यांना गरजेचे आहे. एसटीला विविध समस्यांचा विळखा पडला आहे.