राजोलीतील बेरोजगाराचे स्थानांतरण
By Admin | Updated: May 18, 2014 23:27 IST2014-05-18T23:27:32+5:302014-05-18T23:27:32+5:30
शेतीचा हंगाम संपल्यानंतर हाताला काम नसल्यामुळे बेरोजगार युवकांचे जत्थेच्या जत्थे कामाच्या शोधात स्थानांतरित होत असून या परिसरातील गावखेडे ओस पडू लागल्याचे चित्र आहे.

राजोलीतील बेरोजगाराचे स्थानांतरण
राजोली : शेतीचा हंगाम संपल्यानंतर हाताला काम नसल्यामुळे बेरोजगार युवकांचे जत्थेच्या जत्थे कामाच्या शोधात स्थानांतरित होत असून या परिसरातील गावखेडे ओस पडू लागल्याचे चित्र आहे. या परिसरातील मुख्य व्यवसाय शेती असून वर्षभराची उलाढाल शेतीच्या उत्पादनावरच केली जाते. वर्षभराच्या अन्नधान्याची बेगमी व मुलाबाळाच्या भविष्याची तरतूद करून आर्थिक बजेट याच रोजगारातून बसवावा लागतो. मात्र शेती निसर्गावर अवलंबून असल्याने या व्यवसायात फायद्या निश्चित राहत नाही. कधी अतिवृष्टी, अवर्षण, गारपिट, रोगराई आदीच्या दृष्टचक्राने उत्पादनात आलेली घट आणि सोबतच व्यापार्याच्या धोरणाने हंगामाच्या काळात शेतमालाचे घटविलेले बाजारमूल्य या अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेती व्यवसाय हा विनभरवशाचा झाला आहे. परिणामी शेतकर्याचे आर्थिक बजेट कोलमडून त्यांचे कंबरडे मोडले आहे. परंतु हा व्यवसाय पारंपरिक असून दुसरा पर्याय नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या हंगामाकरिता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून शेतात राबावे लागते. यासाठी येथील शेतीचा हंगाम संपल्यानंतर कुटुंबाच्या भविष्यातील तरतुदीसाठी या परिसरातील शेतमजुर, शेतकरी, बेरोजगार कामाच्या शोधात स्थानांतरीत होत असतो. सध्या तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाला असून ह्यापासून कुटुंबाचे कोसळलेले आर्थिक बजेट सावरण्यास खुपच महत्व होते. यासाठी या परिसरातील गाव खेड्यातल्या मजुराचे जत्थेच्या जत्थे परप्रांतात स्थानांतरित होत आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानक, बसस्थानकावर बेरोजगारांचे जत्थे गँग गंतव्याच्या प्रतीक्षेत दिसत असून तेथे यात्रेचे रूप आले आहे. त्यामुळे गावखेडे ओस पडत आहेत. (वार्ताहर)