भंगारात निघालेली रेल्वेगाडी नागभीड-नागपूर मार्गावर
By Admin | Updated: March 3, 2016 01:14 IST2016-03-03T01:14:55+5:302016-03-03T01:14:55+5:30
मध्य भारतात नॅरोगेज रेल्वे लाईन बंद करून त्याचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भंगारात निघालेली रेल्वेगाडी नागभीड-नागपूर मार्गावर
ब्रॉडगेज मार्गाची मागणी दुर्लक्षित : रेल्वे प्रवाश्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
घनश्याम नवघडे नागभीड
मध्य भारतात नॅरोगेज रेल्वे लाईन बंद करून त्याचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या लाईनवरील भंगारात निघालेल्या गाड्यांपैकी एक गाडी नागभीड-नागपूर या नॅरोगेज रेल्वे लाईनवर चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १ मार्चपासून ही गाडी सुरूही करण्यात आली आहे.
मध्य भारतात ज्या काही नॅरोगेज रेल्वे लाईन होत्या, त्या सर्व नॅरोगेज रेल्वे लाईन बंद करून त्याचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. अनेक मार्गावरील ब्रॉडगेजच्या कामाला सुरूवातही करण्यात आली आहे. अपवाद फक्त नागभीड-नागपूर या नॅरोगेज रेल्वे लाईन ठरली आहे.
मध्य भारतातील अनेक मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होत असल्याने त्या मार्गावरील अनेक मिटरगेज गाड्या निकामी झाल्या. अनेक कर्मचारीही बेकार झाले. निकामी झालेल्या गाड्या उभ्या ठेवायच्या कुठे, असा प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर निर्माण झाला. त्यातूनच त्यातील एक गाडी नागभीड-नागपूर या मिटरगेज मार्गावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
विश्वसनीय माहितीनुसार मध्य भारतात रेल्वेचे जे काही नॅरोगेज रेल्वे मार्ग होते ते आता पुर्णत: बंद झाले असून केवळ १०० कि.मी. अंतराचा नागभीड-नागपूर हाच मार्ग नॅरोगेज म्हणून उरला आहे. या मार्गाशी पुर्व विदर्भातील चार खासदारांचे लोकसभा सलग्न आहेत.
असे असले तरी या मार्गाला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आली आहे. काँग्रेस राजवटीत या मार्गाला रेल्वे बजेटमध्ये स्थान मिळाले होते. पण पुरेशा पाठपुराव्याअभावी निधी मिळू शकला नाही. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या रेल्वे अंदाजपत्रकात या मार्गासाठी २५ कोटीचा निधी उपलब्ध होणार असल्याची चर्चा आहे, पण ठोस पुरावा कोणीच देत नाही.
त्यातच १ मार्चपासून या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्यात आली आहे. या मार्गाचे काम सुरू होणार होते तर नवीन गाडी सुरू करण्याचा उपद्व्याप कशाला करण्यात आला असता, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
राज्य शासनाने या मार्गासाठी पुढाकार घेऊन ब्रॉडगेजचे काम सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.