लॉकडाऊन शिथिल होताच चंद्रपुरात वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:01:11+5:30
शहरातील लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुदींकरणासाठी मनपा गंभीर नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षात सुरळीत होऊ शकली नाही. त्यातच आता कोरोनोची भीती प्रत्येकांच्या मनात आहे. असे असले तरी वाहतूक कोंडी तसेच बाजारात होणारी गर्दी विचार करायला लावणारी आहे.

लॉकडाऊन शिथिल होताच चंद्रपुरात वाहतूक कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे शहरातील दैनदिन व्यव्हार सुरू झाले आहे. परिणाम चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: गोल बाजार, तुकूम, जटपुरा गेट परिसरात या कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली जात आहे.
शहरातील लोकसंख्येसह वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण मात्र झालेले नाही. रस्ते रुदींकरणासाठी मनपा गंभीर नाही. त्यामुळे चंद्रपुरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था मागील अनेक वर्षात सुरळीत होऊ शकली नाही. त्यातच आता कोरोनोची भीती प्रत्येकांच्या मनात आहे. असे असले तरी वाहतूक कोंडी तसेच बाजारात होणारी गर्दी विचार करायला लावणारी आहे. चंद्रपूर शहरात चारचाकी व दुचाकींची संख्याही लाखोंच्या घरात आहे. शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. वाहनांचे आवागमन या मार्गावरून अधिक असले तरी त्या तुलनेत पार्र्कींग झोन उपलब्ध नाहीत. वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे किमान सर्वाधिक संपर्क येतो, त्या महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गांना रुंद करणे गरजेचे आहे.
५ वाजेपर्यंत गर्दी
मागील काही दिवसांपासून बाजारपेठ सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू रहात असल्यामुळे यावेळेत मोठी गर्दी होत आहे. येथील महात्मा गांधी मार्ग, मिलन चौक, जटपुरा गेट चौक, स्टेट बँक परिसर, गोकुल गल्ली, गंजवार्ड, रघुवंशी कॉम्प्लेक्स समोर,गोल बाजार, बिनबा रोड, गांधी चौक या मुख्य ठिकाणासह शहरात अनेक ठिकाणी वाट्टेल तिथे वाहने पार्क केलेली आढळतात. त्यामुळे या ठिकाणी एखादे चारचाकी वाहन आल्यास वाहतुकीची कोंडी होत आहे.