टोलनाक्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST2021-02-18T04:52:06+5:302021-02-18T04:52:06+5:30
गेल्या काही महिन्यांपासून सदर टोलनाका ब्रह्मपुरीवासीयांना खुणावत होता. आता मात्र सदर टोलनाका रीतसर सुरू होत असल्याने वाहनचालकांना ये-जा करताना ...

टोलनाक्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढणार
गेल्या काही महिन्यांपासून सदर टोलनाका ब्रह्मपुरीवासीयांना खुणावत होता. आता मात्र सदर टोलनाका रीतसर सुरू होत असल्याने वाहनचालकांना ये-जा करताना टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
काही महिन्यांपूर्वी नागभीड-ब्रह्मपुरी राज्य महामार्गाचे रुंदीकरण करून सिमेंटीकरण करण्यात आले होते. सदर महामार्ग एकदम चकचकीत करण्यात येऊन ब्रह्मपुरीजवळ असलेल्या खरबी गावाजवळ टोलनाका उभारण्यात आला होता. सदर टोलनाका येत्या दोन तीन दिवसात सुरु होणार असल्याने वाहनचालकांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. विनाकारण फेरफटका मारायला जाणाऱ्या वाहनचालकांना यानंतर आर्थिक भुर्दंड बसणार आहे. कारण टोलनाका असल्याने ये-जा करण्यासाठी पावती फाडावीच लागणार आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांना चाप बसू शकतो. टोलनाका वसुलीसाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली असून विविध प्रकारच्या चारचाकी वाहनांना वेगवेगळ्या स्वरूपाचे दर आकारण्यात आले आहेत. त्यादृष्टीने टोलनाक्यावर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.
एकंदरीत ब्रह्मपुरी लागून असलेला टोलनाका सुरू होत असल्याने यानंतर चारचाकी वाहनचालकांना टोलनाका भरुनच प्रवास करावा लागणार असल्याने वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.