तिघांनी केला वनरक्षकांवर हल्ला
By Admin | Updated: March 5, 2016 00:56 IST2016-03-05T00:56:08+5:302016-03-05T00:56:08+5:30
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील विष्णूनगर नियत क्षेत्रातील कक्ष क्र. ५६७ मध्ये रोपवनाचे चर प्रतिबंधकाचे काम करणाऱ्या वनरक्षकांवर कवडजई येथील तीन जणांनी हल्ला करुन धक्काबुक्की केली.

तिघांनी केला वनरक्षकांवर हल्ला
गुन्हा दाखल : कवडजई येथील आरोपींना अटक
चंद्रपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील विष्णूनगर नियत क्षेत्रातील कक्ष क्र. ५६७ मध्ये रोपवनाचे चर प्रतिबंधकाचे काम करणाऱ्या वनरक्षकांवर कवडजई येथील तीन जणांनी हल्ला करुन धक्काबुक्की केली. मिरचीपुडचा वापर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वनरक्षक अब्बास खान पठाण यांनी कोठारी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असता राघो शंकर गेडाम, वर्षा राघो गेडाम व नितीन सुखदेव येल्लोरे यांच्याविरुध्द कलम ४४७, ३७३, १८६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
मानोरा उपवनक्षेत्रातील विष्णूनगर बिटातील कक्ष क्र. ५६७ मध्ये रोपवन घेण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी क्षेत्रातील मोजणी करुन सिमांकन करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, राघो शंकर गेडाम यांनी वनजमीनीवर अतिक्रमण केलेल्या जागेलगत सदर काम असल्याने अतिक्रमण जागेवर रोपवन घेऊ नये यासाठी सुरु असलेले काम बंद करण्यासाठी मोक्यावर आपली पत्नी व मित्रासह जावून वनरक्षकांस शिविगाळ करुन व मिरची पावडर फेकून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकाराची तक्रार कोठारी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या सबबीखाली गुन्ह्याची नोंद करुन तिघांना अटक करण्यात आली सदर प्रकार २ मार्चला सकाळी १० वाजतादरम्यान घडला.
राघो गेडाम व त्याच्या सहकाऱ्यांनी विष्णूनगर बिटात कवडजई लगत जंगलात अवैधरित्या जंगलाची तोड करुन २५ ते ३० एकर जागेवर अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमण २००६ चे नंतर असून २०१० ला अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न बल्लारपूर वनाधिकाऱ्यांनी केला होता. मात्र योग्य सहकार्य मिळाले नसल्याने व यावर्षी रोपवन घेणे अनिवार्य असून जंगल क्षेत्रात अतिक्रमणावर प्रतिबंधक करण्याचा प्रयत्न आहे.
वनक्षेत्र अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे बल्लारपूर वनाधिकारी दिलीप वडेट्टीवार यांनी लोकमतजवळ सांगितले. अवैधरित्या अतिक्रमण धारकांवर सक्त कारवाई करु, असेही त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)