तीन महिन्यात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: November 21, 2015 00:43 IST2015-11-21T00:43:40+5:302015-11-21T00:43:40+5:30
कर्जबाजारीपणा व नापिकीचा फटका : तीन पात्र तर दोन आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र

तीन महिन्यात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या
कर्जबाजारीपणा व नापिकीचा फटका : तीन पात्र तर दोन आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र
प्रवीण खिरटकर वरोरा
चंद्रपूर जिल्ह्यात आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात शेतकरी आत्महत्या तपासणी बाबत जिल्हास्तरीय समितीने तीन आत्महत्या पात्र तर दोन अपात्र ठरविल्या आहेत.
नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्ज परतफेडीचा तगदा या तीन कारणांनी आत्महत्या केल्या असल्यास शासनाकडून सन २००६ पासून आर्थिक मदत दिली जाते. याची अंतिम तपासणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत करून त्याबाबत निर्णय देण्यात येत असते. या समितीने तीन महिन्यात घडलेल्या पाच आत्महत्या प्रकरणांपैकी दोन प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.
पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर गावातील नानाजी उर्फ रामकृष्ण शंकर पिंपळशेंडे या शेतकऱ्याने ५ सप्टेंबर २०१५ रोजी गावाच्या पायवाटे लगतच्या विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. मृतावर दोन लाख ३१ हजार ६१९ रुपयाचे आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी आष्टाचे कर्ज होते. त्याच्या नावाने पाच हेक्टर जमीन होती. ही आत्महत्या जिल्हास्तरीय समितीने आर्थिक मदतीसाठी पात्र ठरविली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा येथील गणपत वसंत कुत्तरमारे या शेतकऱ्याने २६ आॅगस्ट रोजी गळफास लावून आत्महत्या केली. मृताच्या वडीलाने नावे, पत्नीच्या नावे कर्ज होते. हे प्रकरणही पात्र ठरविण्यात आले. पोंभूर्णा तालुक्यातील थेरगाव येथील अरविंद जैराम वेलादी याने २६ आॅगस्ट रोजी विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. मात्र हे प्रकरण आर्थिक मदतीसाठी अपात्र ठरविले आहे.
भद्रावती तालुक्याील घोडपेठ येथील अमरदीप दिलीप गहुकार याने २७ सप्टेंबर रोजी शेततळ्यात आत्महत्या केली. सदर प्रकरणात ट्रॅक्टरची कामे करीत असल्याने अपात्र ठरविण्यात आले. वरोरा तालुक्यातील दिंदोडा येथील देवेंद्र कवडू आत्राम या शेतकऱ्याने ११ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्यावर सहकारी सोसायटीचे कर्ज होते. सदर प्रकरण जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविले आहे.