जिल्ह्यात कोरोना संसर्गाची हजारी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:59+5:30
जिल्ह्यात सध्या ७७ कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. तर ११५ कंटेन्मेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ११५ कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४०१ आरोग्य पथकाद्वारे १७ हजार ४१९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या ६९ हजार १७९ आहे. जिल्ह्यातील दुर्गापूर, घुग्घुस, बल्लारपूर, नागभीड कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची हजारी पार
चंद्रपूर : २ मेपासून जिल्ह्यात सुरू झालेली कोरोना संसर्गाची श्रृंखला आता बरीच लांब झाली आहे. ऑगस्ट महिन्यात दररोज २० ते ३० रुग्ण वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकड्याने हजारी पार केली. शुक्रवारच्या नव्या ३९ बाधितांंना मिळून जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १०२७ झाली आहे. एकूण १०२७ रुग्णांपैकी ६०९ रुग्णांचा कोरोनातून बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. आता ४०९ रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यांच्यावर चंद्रपुरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केला जात आहे. यातील दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्राने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२८२१ नागरिक बाहेर जिल्ह्यातून व बाहेर राज्यातून आले आहेत. यातील ९१ हजार १०८ नागरिकांना क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. आता काळजी घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात ७७ कंटेन्मेंट झोन
जिल्ह्यात सध्या ७७ कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. तर ११५ कंटेन्मेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ११५ कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४०१ आरोग्य पथकाद्वारे १७ हजार ४१९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या ६९ हजार १७९ आहे. जिल्ह्यातील दुर्गापूर, घुग्घुस, बल्लारपूर, नागभीड कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहून लक्षणे दिसून आल्यास तत्काळ अॅन्टिजेन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नवे ३९ बाधित
शुक्रवारी ३९ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. यात चंद्रपूर शहरातील १७, चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील पाच, गडचांदूर येथील दोन, बल्लारपूर शहरातील सहा, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली आणि ब्रह्मपुरी येथील प्रत्येकी एक, राजुरा दोन तर वरोरा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. चंद्रपूरवगळता इतर ग्रामीण भागातील बाधितांमध्ये गडचांदूर येथील दोन, विवेकानंद वार्ड बल्लारपूर येथील दोन, गोकुळ नगर येथील तीन तर बल्लारपुरातील एक पॉझिटिव्ह पुढे आले आहे. पोंभुर्णा येथील एक, गोंडपिपरीतील एक, ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली येथील एक, सावली तालुक्यातील हिरापूर येथील एक बाधित पुढे आला आहे.
संस्थात्मक अलगीकरणात ८७१ नागरिक
जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात ८७१ नागरिक आहेत. ग्रामस्तरावर ९१ नागरिक, तालुकास्तरावर ३६२ नागरिक तर, जिल्हास्तरावर ४१८ नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९२ हजार ८११ नागरिक दाखल झाले आहेत. यातील ९१ हजार १०८ नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. एक हजार ७०३ नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत. येत्या काही दिवसात त्यांचीही ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जिल्ह्यात अजूनही बाहेर जिल्ह्यातून नागरिक विनापरवानगी येत आहेत. त्यांनी आपली माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.