त्या आगीपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते
By Admin | Updated: March 27, 2016 00:36 IST2016-03-27T00:36:31+5:302016-03-27T00:36:31+5:30
पै-पैसा लावून आणि हाडाची काडं करून त्यांनी उभे केलेले घरे जळत होती आणि त्यातही पाषाणाच्याही हृदयाला पाझर फोडतील,..

त्या आगीपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते
लाखोंचे नुकसान : आगग्रस्तांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली आपबिती
घनश्याम नवघडे नागभीड
पै-पैसा लावून आणि हाडाची काडं करून त्यांनी उभे केलेले घरे जळत होती आणि त्यातही पाषाणाच्याही हृदयाला पाझर फोडतील, अशा त्या आगेत सापडलेल्या चिमुकल्याचा टाहो ते ऐकत होते. पण ते काहीच करू शकत नव्हते. आगीचे रूपच एवढे रौद्र होते की, तिच्यापुढे काहीच चालत नव्हते. येनोलीवासीय ‘लोकमत’ जवळ आपबिती सांगत होते.
मन हेलावणारी ही घटना नागभीड तालुक्यातील येनोली येथे शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास घडली. बाळापूरपासून हे गाव चार किमी अंतरावर असले तरी पूर्णत: जंगलव्याप्त आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम २५० ते ३०० आहे. त्यातही आदिवासी ढिवर समाजाची या गावात संख्या अधिक आहे.
शुक्रवारी आपले जेवण वगैरे आटोपून गावकरी चौकात चर्चेसाठी नेहमीप्रमाणे बसले. गावातील नान्हे आणि कुभले कुटुंबियसुद्धा या चर्चेत सहभागी झाल होते. घरात मुलगा झोपला आहे, म्हणून त्यांनी त्याच्याजवळ दिव्याचा प्रकाश राहावा या हेतूने दिवा लावला आणि बाहेरून दाराची कडी लावून ते सुद्धा चर्चेत सहभागी झाले. नेमका याच दिव्याने घात केला. दिवा पडला की कशाच्या तरी धक्क्याने तो पडला, हे कळायला मार्ग नाही. पण याच दिव्याने घराला आग लागली आणि ती सर्वत्र पसरली. पाहता-पाहता आगीने संपूर्ण घर कवेत घेतले. जवळच चौकात चर्चा करीत असलेल्या लोकांच्या लक्षात ही आग आली. लोक आग विझविण्यासाठी धावले. मिळेल त्या ठिकाणावरुन पाणी आणून आग विझवू लागले.
याचवेळी घरात झोपलेल्या अर्जुन दिवाकर नान्हे हा तिसरीत शिकणारा चिमुकला चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूप्रमाणे आगीच्या लोळात पूर्णपणे सापडला होता. दाराची कडी बाहेरून बंद असल्यामुळे त्याला बाहेरून पळता येत नव्हते. आगीमुळे दाराची कडी काढून त्याला बाहेर काढणे कोणाच्याच हाती उरले नव्हते. काही वेळाने आगीने आपले रौद्ररूप शमविल्यानंतर त्या चिमुकल्या अर्जुनला बाहेर काढण्यात आले. या आगीत अर्जुन ७० टक्के जळाल्याची माहिती आहे. आता तोे नागपूरच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
सदरप्रतिनिधीने येनोली या गावाला भेट दिली असता, घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत होती. आपली नेहमीची कामे सोडून गावातील नागरिक विषण्ण नजरेने या घटनेचीच चर्चा करीत होते. गावावर एखादे संकटच कोसळले अशी भावनाच त्याच्यांत दिसून आली.
वीज पुरवठ्यासाठी केला होता अर्ज
यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की, पिडीत कुटुंबियांनी दोन वर्षांपूर्वीच बीपीएलसाठी असलेल्या योजनेतून वीज पुरवठ्यासाठी अर्ज केला होता. पण संबंधित विभागाकडून त्यांच्या अर्जाची दखलच घेण्यात आली नाही. अर्जाची वेळीच दखल घेण्यात आली असती तर त्यांच्यावर रॉकेलचा दिवा लावण्याची वेळ आली नसती व अशी घटनाही घडली नसती.
तहसिलदारांची तत्परता
आगीची माहिती समजताच येथे कालपरवाच रूजू झालेले तहसिलदार समीर माने यांनी आपल्या ताफ्यासह रात्रीच येनोलीला भेट दिली. पिडीत कुटुंबाचे संसारपयोगी संपूर्ण साहित्यच आगीत भस्म झाल्याने प्रत्येकी दहा किलो अन्न धान्याची व्यवस्था केली, अशी माहितीही गावकऱ्यांनी दिली.