पोटासाठी त्यांनी थाटला शेतातच संसार

By Admin | Updated: March 28, 2016 01:06 IST2016-03-28T01:06:46+5:302016-03-28T01:06:46+5:30

टिचभर पोटाची भूक भागविण्यासाठी माणसाला काय काय करावे लागते, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. गावात रोजगाराची

They stuck to the stomach in the field | पोटासाठी त्यांनी थाटला शेतातच संसार

पोटासाठी त्यांनी थाटला शेतातच संसार

प्रकाश काळे ल्ल गोवरी
टिचभर पोटाची भूक भागविण्यासाठी माणसाला काय काय करावे लागते, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. गावात रोजगाराची सोय नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटविण्यासाठी रोजगाराच्या शोधात असलेल्या त्या दोन कुटुंबीयांनी चक्क तेलंगणा राज्यातून राजुरा तालुक्यातील गोवरी येथे स्थलांतर केले आहे. येथील एका शेतातच संसार थाटला आहे. त्यांच्या रोजगाराच्या प्रश्न तात्पुरता मिटला असला तरी त्यांना पुन्हा कायमस्वरूपी रोजगार मिळविण्यासाठी पुन्हा भटकंती करावी लागणार आहे.
तेलंगणा राज्यातील रूपारूर जि. आदिलाबाद येथील मनोहर विठ्ठल जाधव (४५) व भानुदास माणिक जिव्हारे (६०) यांच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरात अठराविश्वे दारिद्र्य असल्याने पोटाची भूक त्यांनी जवळून अनुभवली आहे. घरी जमिनीचा कोरभर तुकडा नाही, राहायला धड घर नाही. गावाकडे रोजगाराची संधी नाही. एक दिवस मजुरी मिळाली तर चार दिवस हाताला काम नाही, अशा परिस्थितीत पोटाची भूक स्वस्थ बसू देत नव्हती. घरी मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च समोर होताच. मात्र या दोन कुटुंबीयांनी हार मानली नाही. रोजगाराच्या शोधात त्यांनी गाव सोडले. भटकंती करीत त्यांनी राजुरा तालुक्यातील गोवरी येथील भाऊराव रणदिवे यांच्या गावाजवळील शेतातच संसार थाटला. रणदिवे यांचा थोरला मुलगा अमित रणदिवे, सुमीत रणदिवे यांनी त्यांना राहण्याची सोय करून दिली.
गेल्या तीन-चार महिन्यापासून रोजगाराच्या शोधात आलेले हे कुटूंब शेतातच वास्तव्याला आहेत. मनोेहर जाधव यांना दोन मुले व एक मुलगी आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलगी फुलाबाईने दहाव्या वर्गातूनच शिक्षण सोडले. तर त्यांची दोन मुले वसतिगृहात शिक्षण घेत आहे. आई-वडिलांना रोजगारासाठी मदत व्हावी, यासाठी मुलगी फुलाबाई त्यांच्या कामात मदत करते. तर भानुदास जिव्हारे यांच्या पत्नी सावित्रीबाई त्यांना रोजगारासाठी हातभार लावत आहे. दिवसभर शेतात राबायचे आणि काळ्या आईच्या कुशीत क्षणभर विश्रांती घ्यायची, हेच त्यांना ठाऊक आहे.
होळी सणाला गावाला का गेले नाही, अशी विचारणा केली असता ‘सण बिन काई नाई’ दोन वेळेच्या जेवणाचे वांदे आहेत. तिथे कुठला आला सण, असे त्या कुटूंबियांचे म्हणणे आहे. हाताला काम मिळेल, तिथपर्यंत थांबायचे आणि पुन्हा दुसऱ्या गावी नवा रोजगार शोधायचा, हेच कायम त्यांची नशिबी आले आहे. ऊन्ह-वाऱ्याची तमा न बाळगता त्या दोन कुटुंबीयांनी चार महिन्यापासून शेतातच संसार थाटला आहे.

हाताला काम मिळणे झाले कठीण
४विज्ञानाने विविध क्षेत्रात क्रांती घडवून आणल्याने मजुरांच्या हाताने केले जाणारे काम आधुनिक मशीनने केले जात आहे. दिवसेंदिवस रोजगाराच्या संधी कमी होत असल्याने बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. त्यामुळे हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. रोजगार मिळत नसल्याने मजुरांना परप्रांतात जाऊन काम करावे लागत आहे.

Web Title: They stuck to the stomach in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.