रोहयोची मजुरी जमा झालीच नाही
By Admin | Updated: July 8, 2017 00:41 IST2017-07-08T00:41:21+5:302017-07-08T00:41:21+5:30
गेल्या चार-पाच वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा विभागात रोहयो अंतर्गत अनेक कामे केली जात आहे.

रोहयोची मजुरी जमा झालीच नाही
चौकशीची मागणी : भद्रावती तालुक्यातील प्रकार, मजुरांत रोष
लोकमत न्यूज नेटवर्क
वडाळा (तु.): गेल्या चार-पाच वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा विभागात रोहयो अंतर्गत अनेक कामे केली जात आहे. मात्र त्या कामाची मजूरी नियमाप्रमाणे निर्धारीत वेळेनुसार मजुरांच्या खात्यात जमा करण्यास रोहयो यंत्रणेतील कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई प्रमाण यावर्षी वाढलेले आहे. या वर्षीचीही मजुरी अद्याप मजुरांच्या खात्यावर जमा झाली नसल्याने मजुरांत रोष पसरला आहे.
या प्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करुन जबाबदार असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील रोहयो मजुरांकडून होत आहे. याप्रकरणी चंदनखेडा विभागातील वडाळा, घोसरी, सोनगाव, खुटेवेडा, कोंढेगाव, चिचोली, वायगाव (तु.) येथील मजुरांनी वेळेवर मजूरी खात्यात जमा करण्याबाबत वेळोवेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो), तहसीलदार भद्रावती व संवर्ग विकास अधिकारी भद्रावती यांच्याकडे लेखी तक्रारी व प्रत्यक्ष भेटी घेवून आपबिती सांगितली. मात्र त्यांचा काहीही उपयोग झाला नाही.
रोजगार हमी कायद्यानुसार केलेल्या कामाचा हप्ता भरल्यानंतर १५ दिवसाच्या आत मजुरीची रक्कम मजुराच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम संबंधीत यंत्रणेकडून १५ दिवसांपेक्षा जास्त उशिर झाला तर नंतरच्या दिवसांपासून ती रक्कम मजुराच्या खात्यात जमा करेपर्यंत वेतन प्रदान अधिनियम १९३६ नुसार नुकसान भरपाई भत्ता मजुराच्या खात्यात मजुरीच्या रकमेसोबत जमा करणे आवश्यक आहे.
मात्र यावर्षी गेल्या सहा महिन्यांपासून रोहयो मजुरांची मजुरी १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस होवूनही नुकसान भरपाई भत्त्याची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे रोहयो मजुरांना नुकसान भरपाई भत्यापासून वंचित ठेवून रोहयो यंत्रनेतील कर्मचाऱ्यांनी वेतन प्रदान अधिनियम १९४६ च्या तरतुदीचे उल्लंघन केले आहे.
रोजगार हमी योजनेचे काम सुरू झाल्यानंतर काम पूर्ण होऊनही मजुरी अजूनही मिळाली नाही. त्यात खुटवंडा येथील मनोहर नामदेव पेंदाम यांची दोन वर्षापासून तर जनार्धन चिंधू आडे, संध्या संतोष कन्नाके, आम्रपाली खुशाल चिकाटे, सरदार सिताराम कुळमेथे या मजुरांची मजुरी गेल्या चार महिन्यांपासून मिळालेली नाही. त्याचप्रमाणे सितारामपेठ येथील बेबी बबन किन्नाके, सुनिता दिलीप कन्नाके, भामडेळी येथील ज्योती विनोद घरत अशा अनेक गावातील रोहयो मजुरांचा समावेश आहे.
रोहयो मजुरांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणे, मजुरी प्रलंबित ठेवणे, डाटा एंट्री करताना बँक पासबुक क्रमांक व आधार क्रमांक चुकीचा टाकणे, मजुरांना नेटची समस्या सांगणे यासारखे प्रकार पंचायतस्तरावरील रोहयो यंत्रनेतील कर्मचाऱ्यांकडून होत आहे. या प्रकरणाची जिल्हास्तरावर वरिष्ठांनी चौकशी करुन रोहयो कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याची मागणी रोहयो मजुरांकडून होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
कामे देण्यात दिरंगाई
ग्रामपंचायत स्तरावर कामे उपलब्ध करून देण्याचा कायदा असतानाही अनेक गावातील मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे काही मजुरांना मजुरीसाठी इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागल्याचा प्रकार तालुक्यात घडला आहे.