भ्रष्टाचार होऊनही कारवाईचा पत्ता नाही
By Admin | Updated: August 29, 2015 01:25 IST2015-08-29T01:25:34+5:302015-08-29T01:25:34+5:30
नजीकच्या नांदा ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाचे महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी बांधकामासाठी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता.

भ्रष्टाचार होऊनही कारवाईचा पत्ता नाही
साडेसात लाखांची अफरातफर : अहवाल सादर; मात्र कारवाईचा मुहूर्तच साधेना !
गडचांदूर : नजीकच्या नांदा ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाचे महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी बांधकामासाठी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. अधिकाऱ्यांकडून वारंवार चौकशीनंतर सात लाख ३७ हजार ६६५ रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला असून अफरातफर होण्यास सरपंच पूजा ज्ञानेश्वर मडावी व तत्कालीन ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले. असे असताना तीन वर्ष लोटूनही दोषींवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर शंका निर्माण होत आहे.
ग्रामपंचायत नांदा येथे आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत २०१०-११ या वित्तीय वर्षात आठ आंगणवाडी इमारत बांधकामासाठी दोन हप्त्यांमध्ये १० लाख ३५ हजार १९० रुपये व सन २०११-१२ या वित्तीय वर्षात २ अंगणवाडी बांधकामाकरिता ६ लाख ७१ हजार ६०८ रुपये असे एकूण १७ लक्ष ६ हजार ७९८ रुपये ग्रामपंचायत नांदाला अंगणवाडी बांधकामासाठी प्राप्त झाले होते. अंगणवाडी इमारतीचे बांधकाम बाकी असताना निधीची विल्हेवाट लावल्याची बाब आरटीआय कार्यकर्ते अभय मुनोत व हारुण सिद्दीकी यांच्या लक्षात आल्यानंतर भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली. अनेकदा चौकशी करण्यात आली. चौकशीकर्त्या अधिकाऱ्यांनी ७ लाख ३७ हजारांच्या अफरातफरीचा अहवालही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला. मात्र तब्बल तीन वर्ष लोटूनही कारवाई करण्यात आली नसल्याने शासकीय निधी खासगी घशात गेला आहे.
अहवालामध्ये मुल्यांकनापेक्षाही जास्त निधी खर्च केल्याचे नमूद केले आहे.
१० अंगणवाडी बांधकामात ग्रामपंचायतीने १८ लाख रुपये खर्च दाखविला असून ग्रामपंचायत अभिलेखात एकही प्रमाणक उपलब्ध नाही. इतका मोठा भ्रष्टाचार असताना कारवाई न केल्याने दिवसेंदिवस भ्रष्टाचार सुरुच आहे. गावातील बालाजी ले-आऊटने कसल्याही नागरी सोयी- सुविधा करण्याआधी आर्थिक व्यवहार करुन खोटे नाहरकत प्रमाणपत्र देणे, अल्ट्राटेक कंपनीकडून दोन लाख तीन हजार रुपयांचा निधी विजेचे खांब उभारण्याकरिता ग्रामपंचायतला दिला होता. मात्र काम पूर्ण होण्याआधीच ग्रामपंचायतीने कंत्राटदाराला निधी दिला असून याबाबत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे दिली असतानासुद्धा कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. (शहर प्रतिनिधी)