सांगा आता जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:42+5:30
केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी किसान सन्मान योजना जाहीर केली. तीन टप्प्यात दोन-दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये अनुदान मिळणार होते. मात्र त्यातीलही एक दमडीही अद्याप मिळालेली नाही. म्हणायला केवळ यादी तयार करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांचा शासकीय कामावर कायमचा विश्वासच उडाला आहे. यावर्षीच्या सततच्या पावसामुळे पीक परिस्थिती नाजूक असताना परतीच्या पावसाने उभे पीक आडवे केले.

सांगा आता जगायचे कसे?
जयंत जेनेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यात निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी पूर्णत: हादरला असून पेरणी केलेला खर्चही निघणे कठीण झाला आहे. या सर्वामध्ये पुढील वर्षभर काय खायचे, कसे जगायचे असे अनेक प्रश्न शेतकरी कुटुंबासमोर उभे ठाकले आहे.
शासनाने शेताचे सर्व्हेक्षण सुरु केले आहे. बांधावर येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना साहेब, आम्हा कडेबी लक्ष द्या न जी, अशी आर्त हाक सध्या शेतकरी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना करताना दिसत आहे. मात्र सर्व्हेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात काहीच नसल्याने तेही निमुटपणे निघून जात आहे.
केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी किसान सन्मान योजना जाहीर केली. तीन टप्प्यात दोन-दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये अनुदान मिळणार होते. मात्र त्यातीलही एक दमडीही अद्याप मिळालेली नाही. म्हणायला केवळ यादी तयार करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा शासकीय कामावर कायमचा विश्वासच उडाला आहे. यावर्षीच्या सततच्या पावसामुळे पीक परिस्थिती नाजूक असताना परतीच्या पावसाने उभे पीक आडवे केले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेतकरी पुन्हा कामाला लागला. मात्र आता त्याचे पूर्णपणे कंबरडे मोडले आहे. ना सोयाबीनची साथ ना कापसाची अशी अवस्था झाली आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील शेत पिकांची पुरती दाणादाण उडाली आहे. कोरपना तालुक्यात ३१ हजार २०६ हेक्टरवर कापूस, ५ हजार ६९८ हेक्टरवर सोयाबीन, २ हजार ९२७ हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली आहे. मात्र यातील अधिकाधिक क्षेत्रात पीक नुकसानीचा आकडा मोठा आहे.
कापूस खरेंद्री केंद्रावर शुकशुकाट
कापूस उत्पादनासाठी कोरपना तालुका प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे अनेक कापूस खरेदी केंद्र आहे. यावर्षी मात्र दिवाळी संपली असतानाही कापसाची आवक झालीच नाही. यावषीचा हंगाम थंडा जाणार अशी भिती व्यापाºयांनाही सतावत आहे.
तातडीने पंचनामे करण्यासाठी
जि.प. अध्यक्ष यंत्रणेसह बांधावर
चंद्रपूर : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे शासकीय यंत्रणेसह जिल्हाभर बांधावर जावून शेतकऱ्यांची अवस्था जाणून घेत आहे. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांना पंचनामा त्वरित करण्याच्यासूेचनाही दिल्या आहेत. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्याचे पालकंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आहे. त्यांनीही पंचनामे करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले आहेत. पाहणी दरम्यान सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शेतकऱ्यांनी दिले आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्याचे सोयाबीन, धान, कापूस व भाजीपाला इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असुन, हाती आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांसमोर आलेले अस्मानी संकटामध्ये शेतकऱ्यांना त्वरित मदत कशी देता येईल, यासाठी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावांना भेट देत आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेतील इतरही पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरु केली आहे. यामध्ये ब्रह्मपुरीपासून जिवतीपर्यंत सर्वच तालुक्यातील गावागावांत सर्वेक्षणही सुरु केले असून मदत मिळेल,अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.