शिक्षकाने केले शिक्षकांनाच नापास
By Admin | Updated: October 10, 2015 00:23 IST2015-10-10T00:23:05+5:302015-10-10T00:23:05+5:30
विद्येचे माहेरघर ब्रह्मपुरी येथे सरस्वती, सावित्रीबाई फुले यांच्या चरणांना स्पर्श करून अनेक शिक्षक विद्यादानाचे पवित्र्य कार्य प्रामाणिक बजावत असल्याने या नगरीला शिक्षणनगरी अशी ख्याती ....

शिक्षकाने केले शिक्षकांनाच नापास
रवी रणदिवे ब्रह्मपुरी
विद्येचे माहेरघर ब्रह्मपुरी येथे सरस्वती, सावित्रीबाई फुले यांच्या चरणांना स्पर्श करून अनेक शिक्षक विद्यादानाचे पवित्र्य कार्य प्रामाणिक बजावत असल्याने या नगरीला शिक्षणनगरी अशी ख्याती पंचक्रोशीत नामाभिधान झाली आहे. मात्र शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तृतीय वर्षाला शिकणारी स्वाती निकुरे या विद्यार्थिनीने प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने एका शिक्षकाने येथील हजारो शिक्षकांना चक्क नापासच केल्याचे कृत्य असल्याचे बोलले जात आहे.
स्वाती ही मूळची चिंचाळा (घुग्घुस) येथील रहिवासी होती. दहावी परीक्षा उत्तीर्ण करून तिला ब्रह्मपुरीला पॉलिटेक्नीक करायला यावे लागले. पाहता पाहता तिचे दोन वर्ष मजेत गेले. सुखदु:खाच्या सोबतीचे तिने फक्त आणि फक्त शिक्षणच घेतले. वडील टिप्पर ड्रायव्हर व आई मजुरीचे काम करून मुलीमध्ये इंजिनिअरची स्वप्ने पाहात, आमचेही दिवस सोनेरी येथील ही आस लावून बसले होते. पण स्वातीने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करुन त्यांना पुन्हा दु:खाच्या खाईत टाकले आहे. ते केवळ ज्याला गुरुचे स्थान आहे, ज्याला समाजात मानाचे स्थान आहे, त्या शिक्षकाकडूनच असे कृत्य होईल, असे स्वप्नातही स्वातीने व कुटुंबीयाने मनातही आणले नसेल. त्याच विद्यादानाच्या भोक्त्याने एका विद्यार्थिनीचा जीव घ्यावा, ही शोकांतिका साऱ्या शिक्षकांचा अपमान व काळीमा लावणारी असल्याने आम्हा साऱ्या शिक्षकांना या प्राध्यापकाने नापासच केल्याची खंत वाटत असल्याची शिक्षक वर्ग बोलून दाखवित आहे.
तंत्रनिकेतनमध्ये शिकणारे विद्यार्थी सर्वच काही श्रीमंत घराण्यातील नसतात. रिक्षावाले, मजूर, शेतकरी, कबाळकष्ट करणाऱ्या कुटुंबातील मुले ब्रह्मपुरीला शिक्षण घेतात, हे वास्तव्य आहे. आपली पदरमोड करुन मुलांना, मुलींना पालक शिकवितात. त्यातील काही मुले मौज करतात. पण जी मुले गरीब कुटुंबातील आहेत, ती खरच शिकण्यासाठीच धडपड करत असतात. कॉलेजमध्ये प्राध्यापकांमध्ये झालेले प्रसंग ते कधीच पालकांना सांगत नाही. विविध परीक्षेचे गुण आपल्याला मिळणार नाही. नापास होऊ या भीतीपोटी विद्यार्थी बोलत नाही. परंतु वारंवार अन्याय व अपमान झाला तर अशा घटना घडतात. विद्यार्थी चुकला तर त्याला योग्य मार्ग दाखविणे हे शिक्षकाचे मुख्य कर्तव्य आहे. येथे तर विद्यार्थ्यांला दबावात ठेवणे, त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे या गोष्टी शिक्षकीपेशाला काळीमा फासणाऱ्या आहेत.
महाविद्यालयाला नियमित प्राचार्य नाही
गेली अनेक वर्षांपासून या महाविद्यालयात नियमित प्राचार्य नाही. प्रभारी प्राचार्यावर हे महाविद्यालय सुरू असल्याने वचक राहीले नाही. येथे पाण्याची समस्या प्रमुख असली, तरी अनेक बाबींचा अजूनही अभाव आहे. प्रा. सुहास मेश्राम हे ज्या विभागात कार्य करीत होते त्या विभाग प्रमुखाला या साऱ्या घडामोडीचा सुगावा का लागला नाही व लागला असेल तर त्यांनी या प्रकारावर योग्य भूमिका का घेतली नाही, असे एक ना अनेक प्रश्नांची धूळफेक या घटनेने या महाविद्यालयावर पालक, विद्यार्थी व शहरातील जाणते नागरिक करीत आहेत.