तेलंगणा सीमेवरील वणी केंद्राच्या शाळा झाल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:24 IST2021-02-20T05:24:01+5:302021-02-20T05:24:01+5:30
जिवती : तालुक्यातील वणी केंद्रातील निम्म्यापेक्षा अधिक शाळा महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर आहेत. २७ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेच्या शाळा ...

तेलंगणा सीमेवरील वणी केंद्राच्या शाळा झाल्या बोलक्या
जिवती : तालुक्यातील वणी केंद्रातील निम्म्यापेक्षा अधिक शाळा महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर आहेत. २७ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. जिवती पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम अशा वणी केंद्रातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक फायदा कसा होईल, या दृष्टीने शिक्षकवर्ग विविध उपक्रम राबवित आहे. यामुळे शाळा बोलक्या झाल्या आहे.
शाळेची इमारत सुसज्ज, स्वच्छ दिसावी, विद्यार्थ्यांना पोषक वातावरण मिळावे, यासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. प्रत्येक शाळेतील शिक्षक स्वत: शाळेची इमारत, आवारभिंतीची रंगरंगोटी, शैक्षणिक चित्रे काढताना दिसून येतात. मैत्री करूया पाढ्यांशी, स्वाध्याय उपक्रम, एक मूल एक झाड, मिशन मॅथेमॅटीक्सअंतर्गत गावातील भिंतीवरही शैक्षणिक वातावरण निर्मिती चित्रे रेखाटली जात आहेत. शिष्यवृत्तीची वा नवोदयची परीक्षा असो परीक्षेचे उद्बोधन शिक्षकांकडून नेहमीच सुरू असते. शंभर टक्के तंबाखूमुक्त शाळा फलक येथे लागला आहे. शाळेच्या आवारात फुलझाडे बघायला मिळतील.
वणी केंद्रात एकूण १९ शाळा असून, पैकी ११ शाळा या महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर आहेत. या गावांत पूर्वीपासूनच तेलंगणाच्याही शाळा आहेत. आजघडीला तेलंगणाच्या शाळा बंद अवस्थेत आहेत. सध्या वणी केंद्रातील शाळा उपक्रमशील असून, यासाठी शिक्षकांसह या केंद्राचे प्रमुख सुधाकर चंदनखेडे यांचेही योगदान मोठे आहे.