ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तेलीयाची राखरांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:37 IST2017-05-04T00:37:19+5:302017-05-04T00:37:19+5:30
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन अंतर्गत येणाऱ्या महत्वपूर्ण अशा तेलीया जलाशयाच्या नयनरम्य जंगलाला आग लागून ४.५ किमी क्षेत्राची आगीत जळून राख झाली.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तेलीयाची राखरांगोळी
वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात : वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
दुर्गापूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन अंतर्गत येणाऱ्या महत्वपूर्ण अशा तेलीया जलाशयाच्या नयनरम्य जंगलाला आग लागून ४.५ किमी क्षेत्राची आगीत जळून राख झाली. बुधवारी अकस्मात लागलेल्या या आगीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला मोठा फटका बसला आहे. कोर झोनमध्ये आग लागल्याने वाघासह अन्य सरपटणाऱ्या वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ६२५ चौ.किमीच्या संरक्षित क्षेत्रात कोर झोनचा दर्जा आहे. याच्या मध्यभागी तेलीयाचे जलाशय आहे. उन्हाळ्यात ताडोबातील बहुतेक नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडतात. ताडोबा जलाशयाव्यतिरिक्त केवळ तेलीया जलाशयात मुबलक पाण्याचा साठा असतो.
मुबलक पाणी व हिरव्यागार असलेल्या या जलाशयाच्या आसपास वाघासह सारेच वन्यजीव आश्रयास असतात. अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील महत्वाच्या ठिकाणी गुरुवारी (२७) अकस्मात भिषण आग लागली. तीव्र गतीने जोरदार वाऱ्याच्या दिशेने या आगीचा सर्वत्र भडका उडत होता. बॉम्बचा स्फोट होऊन भडका उडतो, त्याप्रमाणे या आगीचे रौद्ररुप होते. काही वेळातच या आगीने तेलीया जलाशयासभोवतालचे ४.५ किमीचे क्षेत्र कवेत घेतले. जैवविविधतेने संपन्न अशा वन्यजीवांच्या आश्रयस्थानाची काही वेळातच राखरांगोळी झाली.
सध्या सूर्य आग ओकत आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात वन्यप्राणी तेलीया जलाशयाच्या आश्रयात राहतात. मात्र या परिसरालाच आग लागल्याने वाघासह अन्य वन्यजीव प्रभावित झाले आहे. तृणभक्षी वन्यजीवांचा चारा, पक्ष्यांची पिल्ले, अंडी, घरटे, सरपटणारे प्राणी किटक फूलपाखरे तसेच विविध वनस्पती बियाणे भस्मसात झाले. तेलीया जलाशयाच्या या ४.५ किमीच्या राऊंडमध्ये एरवी पर्यटकांना वाघासह सरपटणाऱ्या वन्यजीवांचे हमखास दर्शन होत होते. मात्र आता तेथे केवळ जळालेली वृक्ष व राखेचे दर्शन होत आहे. यामुळे पर्यटकांचाही भ्रमनिराश होत आहेत.
मानवनिर्मित या आगीमुळे वनाचे वैभव असलेल्या वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. व्याघ्र संरक्षण व संवर्धन करण्याकरिता वनविभाग कसोशीने प्रयत्न करीत आहे. मात्र दरवर्षी उन्हाळ्यात जंगलाला ठिकठिकाणी आगी लागतच आहेत. यातच ताडोबाच्या कोर झोनमध्ये आग लागणे, हे वन्यजीवांच्या अस्तित्वाकरिता एक धोक्याची घंटा आहे. याकरिता वनविभागाला ठोस पावले उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)