साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना करा- जिल्हाधिकारी
By Admin | Updated: June 7, 2014 23:52 IST2014-06-07T23:52:48+5:302014-06-07T23:52:48+5:30
पावसाळ्यात होणार्या डेंग्यू मलेरिया यासारखे साथीचे रोग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना आखाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना करा- जिल्हाधिकारी
चंद्रपूर : पावसाळ्यात होणार्या डेंग्यू मलेरिया यासारखे साथीचे रोग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना आखाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद सोनुने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे व अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात साथीचे रोग मोठय़ा प्रमाणात होत असून या आजारामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात येते. यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुराचा धोका असलेल्या संभाव्य गावांमध्ये औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा तसेच पावसाळ्यात होणार्या प्रसुतीचा अहवाल ताबडतोब सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
पावसाळ्यात होणार्या आजाराबाबत नागरिकांत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करावी, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, दाखल होणार्या रुग्णांची रक्त तपासणी तातडीने करून त्याचा अहवाल संबंधित रुग्णांना तात्काळ देण्यात यावा. नागरिकांनी कोरडा दिवस पाळण्यासोबतच नियमित तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
साथीच्या रोगासंदर्भात माहिती देण्यासाठी डॉ. आठल्ये यांनी या बैठकीत सादरीकरण केले. किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विभागनिहाय समन्वय साधून उद्रेकाची माहिती सर्व अधिकारी व डॉक्टर यांनी तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दक्षता पथक स्थापन करण्यात आले असल्याची माहिती दिली.(प्रतिनिधी)