अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:17+5:302021-02-05T07:35:17+5:30
गोंडपिपरी : तालुक्यातील बहुतांश रेती घाटावर गेल्या काही महिन्यांपासून रेती माफियांनी दिवस-रात्र उत्खननाचा सपाटा चालविला असून, यामुळे शासनाचे कोट्यवधी ...

अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा
गोंडपिपरी : तालुक्यातील बहुतांश रेती घाटावर गेल्या काही महिन्यांपासून रेती माफियांनी दिवस-रात्र उत्खननाचा सपाटा चालविला असून, यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, महसूल विभागाच्या आधिकाऱ्यांच्या साटेलोटे धोरणामुळे हा सर्व प्रकार चालू असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला असून, या सर्व प्रकाराची चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी गोंडपिपरी तहसिलदारामार्फत महसूलमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
गोंडपिपरी तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, अंधारी, वर्धा या नदी पात्रात, तसेच जवळच्या परिसरातील धाबा हिवरा आणि इतर नाल्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रेतीसाठा दरवर्षी उपलब्ध होतो. गेल्या वर्षीपासून पर्यावरण विभागाच्या अडसर धोरणामुळे रेती घाटांचे लिलाव झाले नाही. अशा स्थितीत वाळूमाफियांनी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांची साटेलोटे करून, तालुक्यातील फुर्डीहेटी, लिखित वाडा, येनबोथला,हिवरा, कुलथा, धाबा, आदी रेती घाटावरून चक्क पोकलॅण्ड यंत्राच्या साहाय्याने अवैध उत्खननाचा सपाटा गेल्या काही महिन्यांपासून सुरू केला आहे. यात तालुक्यातील ट्रॅक्टर चालक मालक यांचा ही समावेश असून, रात्रपाळी रेती घाटातून रेती उपसणे, त्यानंतर साठवणूक केलेली रेती मोठ्या हायवा गाड्यांच्या माध्यमातून शहरी भागात विक्री करणे, असा अत्यंत गंभीर प्रकार सुरू आहे. तत्पूर्वी याच गोरख धंद्याला अधिकृत स्वरूप देण्यासाठी रात्रपाळी अगोदर रेतीचा उपसा करून साठा तयार करणे व त्यानंतर महसूल विभागाकडून त्याची जप्ती दाखवून मनमर्जीतील वाळू माफियांना वाहतुकीच्या परवाना देणे ही नवी शक्कल लढविली जात आहे. शासनाच्या वाळू घाट लिलाव बंदीला तिलांजली देत रेती माफिया व महसूल अधिकारी यांनी आगळी वेगळी शक्कल लढवून शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्याचा प्रकार गोंडपिपरी तालुक्यात सर्रास सुरू आहे. येत्या सात दिवसांच्या आत तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य वाळू उत्खनन प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकेश वानोडे यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन सादर करताना प्रामुख्याने शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकेश वानोडे, स्वतंत्र भारत पक्ष तालुकाध्यक्ष व्यंकटेश मल्लेलवार, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष ॲड. प्रफुल्ल आस्वले, शिवसेना उपतालुका प्रमुख हरमेलसिंग डांगी, सुरेश भसारकर, रामदास मोहुर्ले, गंगाधर तेलकापल्लीवार उपस्थित होते.