निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरू
By Admin | Updated: March 14, 2015 01:11 IST2015-03-14T01:11:52+5:302015-03-14T01:11:52+5:30
काँग्रेस सरकारने सेविकेला ९५० रुपये तर मदतनिसाला मानधनात ५०० रुपयांची वाढ केली होती. १ एप्रिल २०१४ पासून त्याची अंमलबजावणी देखिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरू
चंद्रपूर : काँग्रेस सरकारने सेविकेला ९५० रुपये तर मदतनिसाला मानधनात ५०० रुपयांची वाढ केली होती. १ एप्रिल २०१४ पासून त्याची अंमलबजावणी देखिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे जी.आर. देखील काढण्यात आला. चार महिने वाढीव दराने मानधनही देण्यात आले. असे असताना भाजपा शासनाने ही बाबच अमान्य केली आहे. आता १ एप्रिल २०१५ पासून मानधन वाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंगणवाडी महिलांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर अंगणवाडी महिलांचा असंतोष रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी दिला.
अंगणवाडी महिलांचा मेळावा वंदना मुळे यांच्या अध्यक्षतेखाली येथे पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शारदा लेनगुरे, संध्या खनके, प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. वर्षा वाघमारे म्हणाल्या, भाजपा शासनाने अंगणवाडी महिलांच्या पोटात खंजिर खुपसला आहे. त्याचा जाब त्यांना भविष्यात द्यावा लागेल. प्रा. दहीवडे म्हणाले, एक दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी संप पुकारून रस्त्यावर येऊन जे मिळविले ते भाजपा शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे हिसकावून घेण्यात आले आहे.
रेखा रामटेके यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी वंदना मुळे, पवित्रा ताकसांडे, राधा सुंकरवार, अल्का नळे, आशा नाखले, इंदू चल्लीलवार, कल्पना देशकर यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)