अपघात प्रवण क्षेत्रात उपायोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:42 IST2018-09-28T22:42:03+5:302018-09-28T22:42:24+5:30
जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रात संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी दिले. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

अपघात प्रवण क्षेत्रात उपायोजना करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रात संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवारी दिले. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी खेमणार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, आयुक्त संजय काकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्या साखरवडे, कार्यकारी अभियंता जयस्वाल, जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, २०१५ ते २०१७ या वर्षात जिल्ह्यात अपघात व मृत्यंूचे प्रमाण सतत वाढत आहे. भारतात दरवर्षी दीड लाख लोकांचा अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. यावर उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील २८ ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र म्हणून परिवहन विभागाने निवड केली. शिवाय उपाययोजनाही सुचविल्या आहेत. काही उपाययोजना दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश ना. अहीर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापौर अंजली घोटेकर यांनी वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची विनामूल्य मदत घेण्याचा प्रस्ताव या बैठकीत ठेवला. ना. अहीर यांनी या प्रस्तावा दुजोरा दिला. जिल्ह्यात अवैध बस वाहतूक, जड वाहतुकीमुळे प्रदूषण वाढत आहे. अशा वाहणांवर कडक करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५ लाख ७४ हजार वाहने असून त्यामध्ये ४ लाख ७० हजार दुचाकी आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने असल्याने परिवहन नियमन करणे जिकरीचे होते. जिल्ह्यातून १०७ कोटींचा महसूल परिवहन विभागाकडून राज्य सरकारला मिळतो. त्यामुळे विभागाचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येईल, असेही ना. अहीर यांनी सांगितले. अशा प्रकारची बैठक तीन महिन्यांतून एकदा घ्यायची असली तरी दोन महिन्यांच्या आत बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार व पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी जिल्ह्याची माहिती सादर केली.