लेखी आश्वासनानंतर सफाई कामगारांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST2021-02-18T04:52:15+5:302021-02-18T04:52:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंडपिपरी : स्थानिक नगर पंचायतींतर्गत शहर स्वच्छतेचे कंत्राट स्वयंरोजगार ग्राहक संस्था, अहेरीला देण्यात आले होते. ...

लेखी आश्वासनानंतर सफाई कामगारांचे उपोषण मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : स्थानिक नगर पंचायतींतर्गत शहर स्वच्छतेचे कंत्राट स्वयंरोजगार ग्राहक संस्था, अहेरीला देण्यात आले होते. मात्र, या संस्थेमार्फत कार्यरत सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या ईपीएफचा भरणा संस्थेकडून न करण्यात आल्याने सफाई कामगारांनी याविरोधात बंड पुकारून अगोदर साखळी उपोषण व नंतर बेमुदत उपोषण सुरुवात केले होते. अखेर नगर पंचायतीने सफाई कामगारांच्या मागण्या मान्य करत संबंधित संस्थेला ईपीएफचा भरणा करण्यासंदर्भात लेखी पत्र काढून कामगारांच्या इतरही मागण्या मान्य केल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
तत्पूर्वी २०१९-२०मध्ये स्थानिक नगर पंचायतींतर्गत शहर स्वच्छतेचे कंत्राट अहेरी येथील स्वयंरोजगार ग्राहक संस्थेला देण्यात आले होते. याचदरम्यान या संस्थेकडून सफाई कामगार म्हणून गोंडपिंपरी येथील कामगारांना कामावर घेण्यात आले. मात्र, त्यांना अल्प मजुरी देऊन व त्यांचा भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) वेळोवेळी भरणा करण्यात आला नाही. यामुळे कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ही बाब लक्षात येताच सफाई कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्याशी संपर्क साधून झालेल्या अन्यायाची माहिती देत नगर पंचायतीच्या परिसरात साखळी उपोषण सुरू केले. मात्र, आठ दिवस साखळी उपोषण करूनही नगर पंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सफाई कामगारांनी अखेर बेमुदत उपोषण सुरु केले. त्यामुळे नगर पंचायतीने या उपोषणाची गंभीर दखल घेत सफाई कामगारांच्या मागण्या मान्य करत संबंधित कंत्राटदार संस्थेला ईपीएफ भरण्यासंबंधी तसेच कामावरून काढून टाकलेल्या कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याबाबत, सफाई कामगारांवर देखरेख करण्याकरिता नियोजित कर्मचाऱ्याला कामावरून हटविणे तसेच बाजार परिसरात ठेवलेले वीजखांब परस्पर लंपास केल्याप्रकरणी संबंधित सुपरवायझरवर कारवाई करण्याची मागणी नगर पंचायतीने वीज मंडळाकडे केली आहे. एकंदरीत या संपूर्ण घटनाक्रमात कामगारांचे गेल्या पाच वर्षांत जे अर्थिक शोषण झाले त्याला आता पूर्णविराम मिळाला असून, उपोषणकर्त्या कामगारांनी जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले.