बचतगट महिलांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:01 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:01:03+5:30
अंगणवाड्यामध्ये बचत गटांमार्फत आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र अनेक ठिकाणी अंगणवाड्यांचा आहार पुरवठा करणाऱ्या बचतगट महिलांना अपात्र ठरविण्यात येत असून नवनवीन बचतगटांना आहार पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात येत आहे. त्यामुळे बचतगटांच्या महिलांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

बचतगट महिलांचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अंगणवाड्यांना आहार पुरवठा करणाऱ्या बचतगट महिलांना अपात्र ठरवून नव्या बचतगटांना कामे देण्याच्या विरोधात बचतगटांच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जुन्या गटांना तातडीने कामे उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.
अंगणवाड्यामध्ये बचत गटांमार्फत आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र अनेक ठिकाणी अंगणवाड्यांचा आहार पुरवठा करणाऱ्या बचतगट महिलांना अपात्र ठरविण्यात येत असून नवनवीन बचतगटांना आहार पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात येत आहे. त्यामुळे बचतगटांच्या महिलांमध्ये संताप व्यक्त केला आहे. याविरोधात बचतगटाच्या महिलांनी राजेश पिंजरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या प्रसंगी प्रा. रमेशचंद्र दहीवले, रेखा रामटेके यांच्यासह शेकडो बचतगटांच्या महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. प्रा. रमेशचंद्र दहीवडे म्हणाले, गेल्या दहा वर्षापासून जास्त कार्यालयापासून अंगवाड्यांना आहार पुरवठा करणाऱ्या बचतगट महिलांना अपात्र ठरविले, नवनवीन बचतगटांना कामे देणे हा भ्रष्टाचार आहे. बचतगटाच्या खात्यावर २५ हजार रूपये डिपॉझिट राहण्याची अट २७ जानेवारीला शिथिल करण्यात आली. ती आता दहा हजार रूपये करण्यात आली, असे असतानाही तीन फेबु्रवारीला जी यादी प्रकल्प कार्यालयातर्फे लावण्यात आली. त्यावेळी २५ हजारांची अट हाच आधार पकडून पात्र, अपात्र बचगटाची यादी जाहीर करण्यात आली. ती अन्यायकारक आहे. घोषित केलेली यादी रद्द करावी, जुन्या बचगट महिलांना कामे देण्यात यावी, अशी मागणी राजेश पिंजरकर यांनी केली. आभार रेखा रामटेके यांनी मानले. याप्रसंगी जिल्ह्यातील अनेक बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गेल्या कित्येक वर्षांपासून अंगणवाड्यांना आहार पुरवठा करण्याचे काम बचतगटांच्या महिला करीत आहे. मात्र, आता जुन्या गटांना डावलून नव्या गटांना कामे देण्यात येत आहे. यामुळे जुन्या बचतगटांच्या महिलांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. जुन्या बचतगटांच्या महिलांना कामे देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.