‘सूर्यांश’ साहित्यिक व रसिकांमधील संवादसेतू
By Admin | Updated: August 29, 2015 01:22 IST2015-08-29T01:22:26+5:302015-08-29T01:22:26+5:30
साहित्यक्षेत्रात वावरत असताना अनेक नवोदित साहित्यिक कलावंत व लेखकांना साहित्यप्रवाहात सामावण्याची इच्छा असते.

‘सूर्यांश’ साहित्यिक व रसिकांमधील संवादसेतू
चंद्रपूर : साहित्यक्षेत्रात वावरत असताना अनेक नवोदित साहित्यिक कलावंत व लेखकांना साहित्यप्रवाहात सामावण्याची इच्छा असते. परंतु मोठ्या साहित्य संस्थांच्याही काही अडचणी असल्याने त्यांना मर्यादा येतात व अशावेळी छोट्या साहित्य संस्था नवोदित लेखकांसाठी महत्वपूर्ण ठरतात. चद्रपूरच्या सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंचाने ही भूमिका प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. नवोदित लेखकांसाठी ही संस्था माहेरघर आहे. असे म्हणायला हरकत नाही. लेखक व रसिक यांच्यातल्या संवादाला जोडण्याकरिता सूर्यांश संवादसेतूचे काम करीत आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कादंबरीकार व साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. याप्रसंगी चंद्रपुरातील प्रसिद्ध चिकित्सक डॉ. अशोक वासलवार अध्यक्षस्थानी तर ख्वाडा चित्रपटाचे गीतकार विनायक पवार, प्रसिद्ध समीक्षक डॉ. श्याम मोहरकर, पावसाच्या कवीसंमेलनाचे अध्यक्ष विष्णू सोळंकी आणि विदर्भ साहित्य संघाचे मोहिते उपस्थित होते. सूर्यांशतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून साहित्य क्षेत्रात मागील सहा वर्षापासून पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. बाबुराव कोंतमवार स्मृती सूर्यांश पुरस्कार प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांना कविता लेखनासाठी, अशोकसिंग ठाकूर पुरस्कृत कादंबरी पुरस्कार मनोहर पाटील यांना ढलवा कादंबरीसाठी, गुलाबराव पेंदाम स्मृती कवितासंग्रह विनायक येवले यांच्या ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरुन’ या कवितासंग्रहाला आणि प्रा. दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार साधना लव्हाटे यांच्या ‘रंग गहीरे’ या कथासंग्रहाला तसेच गीता रायपूरे यांना नवोन्मेष पुरस्कार डॉ. शोभणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साधना लव्हाटे यांच्या वतीने रावजी चवरे व लोकनाथ यशवंत यांच्या वतीने आशीष देव यांनी पुरस्कार स्वीकारला. एक हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेने घेतलेल्या पावसाच्या कवितांच्या स्पर्धेत विजेते दिगंबर शिंदे, नरेशकुमार बोरीकर, सुनील पाटील, नीता कोंतमवार व सुरेश गारघाटे या कवींनाही सन्मानित करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)