उन्हाची काहिली वाढली

By Admin | Updated: March 27, 2016 00:32 IST2016-03-27T00:32:52+5:302016-03-27T00:32:52+5:30

चंद्रपूर जिल्हा ‘हाट’ जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाळा तर चांगलाच प्रसिध्द झाला आहे.

The sun shines | उन्हाची काहिली वाढली

उन्हाची काहिली वाढली

दुपारी वर्दळ कमी : पारा ४० अंशापार, अडगळीतले कुलर निघाले बाहेर
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा ‘हाट’ जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाळा तर चांगलाच प्रसिध्द झाला आहे. होळी संपल्यानंतर सुर्याचा पारा चढत जातो, असा सर्वमान्य संकेत आहे. मात्र चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातच मार्चच्या पंधरवाड्यापासूनच सुर्याचा पारा चढू लागला आहे. आता तर मार्च महिन्यातच उन्हाचा पारा ४० अंशापार गेला आहे. उन्हाची काहिली चंद्रपूरकरांना आतापासूनच असह्य होऊ लागली आहे.
या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सिंचन प्रकल्पातही पाणी नाही. ग्रामीण भागातील नदी-नाले, बोड्या, तलाव आटण्याच्या मार्गावर आहेत. अशातच आता उन्हाळ्यालाही चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून सुर्य आग ओकू लागल्याचे भासत आहे. दिवसेंदिवस उन्हाची काहिली वाढत असल्याने नागरिकांनाही ती असह्य होऊ लागली आहे. आज शनिवारी जिल्ह्यात ४०.२ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल शुक्रवारीदेखील ४०.१ अंश सेल्सीयस तापमान होते. मार्च महिन्यातच सुर्याचा पारा ४० अंशापार गेल्याने एप्रिल आणि मे महिन्यात काय हाल होतील, याची चिंता चंद्रपूरकरांना लागली आहे.
उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनीही दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे कमी केले आहे. आवश्यक कामासाठीच नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास चंद्रपुरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी होऊ लागली आहे. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग सोडले तर इतर मार्ग दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे दिसून येत आहे. दुपारची वर्दळ कमी झाल्याने सायंकाळी व रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. नागरिक आपल्या कुटुंबासह खरेदीसाठी सायंकाळीच घराबाहेर पडताना दिसून येत आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक नानाविध उपाय करताना दिसून येत आहे. तोंडावर रुमाल, डोक्यावर टोपी घालणे नागरिकांनी सुरू केले आहे.
त्यामुळे टोप्यांची दुकाने, गागल्सची दुकाने फुटपाथवर लागली आहे. याशिवाय चंद्रपूर शहरातील प्रत्येक गल्लीबोळात फिरत्या रसवंत्या दिसू लागल्या आहेत. या रसवंत्यांनाही सुगीचे दिवस आले आहे. (शहर प्रतिनिधी)

पाण्याची पातळी खालावली
दुसरीकडे उन्हाची काहिली वाढल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. नदी-नाले, तलाव तर आटण्याच्या मार्गावर आहेच; शिवाय ग्रामीण भागातील जलस्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल यांचे पाणीही कमी होत आहे. कोरपना, जिवती तालुक्यातील अनेक गावात आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवत आहे. माणिकगड पहाडावरील अनेक गुड्यातील लोक पाण्यासाठी एक-दोन किलोमीटरची पायपीट करताना दिसत आहेत.

मडक्यांची मागणी वाढली
उन्हाची काहिली वाढली की थंड पाणी मोठा आधार वाटतो. त्यामुळे मडक्यांची मागणी वाढते. आताही येथील कुंभार चाळीत नागरिकांची माठ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. अनेक छोटे व्यावसायिक, गोरगरीब नागरिक फ्रिज घेण्याच्या भानगडीत न पडता माठातच पाणी ठेवतात. त्यामुळे सध्या माठांच्या किमतीही वधारल्या आहे. पूर्वी ४०-५० रुपयात मिळणाऱ्या माठाची किंमत आता शंभर-दीडशे रुपयांवर गेली आहे.

होळीच्या आदल्यादिवशी सर्वाधिक तापमान
होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे २२ मार्चला चंद्रपुरात ४३ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. त्यानंतर सुर्याचा पारा कमी झाला. तरीही तो ४० अंशापार आहेच.

Web Title: The sun shines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.