उपविभागीय कार्यालयाने सेवा केंद्र म्हणून काम करावे
By Admin | Updated: May 31, 2015 02:03 IST2015-05-31T02:01:11+5:302015-05-31T02:03:56+5:30
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राला आदर्श मतदार संघ बनविण्याचा मानस आहे. आम्ही नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्ती करतो.

उपविभागीय कार्यालयाने सेवा केंद्र म्हणून काम करावे
बल्लारपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्राला आदर्श मतदार संघ बनविण्याचा मानस आहे. आम्ही नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्ती करतो. शासकीय सेवा लोकाभिमूख करण्यासाठी कार्यालये चार भिंतीचे घर नसून येथील उपविभागीय कार्यालयाने सेवा केंद्र म्हणून कार्य करावे, असे आवाहन वित्त आणि नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
येथील उपविभागीय कार्यालयाचे शुक्रवारला उद्घाटन करण्यात आले. नांदगाव(पोडे) येथील सर्वसामान्य शेतकरी सुधाकर उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय रसायने व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, बल्लारपूरच्या नगराध्यक्षा छाया मडावी, पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ-ठुबे, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, बल्लारपूरचे तहसीलदार डी.एस. भोयर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन सर्वसामान्य शेतकरी सुधाकर उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. ही सार्वजनिक कामाची सुरुवात आहे. यानंतर शासनाच्या सर्व कामाचे भूमिपूजन, उद्घाटन शेतकरी, कष्टकरी महिला, मजूर व सर्वसामान्य मतदारांच्या हस्ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मतदार संघाच्या विकासासाठी कटीबद्ध असून विकासात्मक कामासाठी निधीची कधीही कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी भाषणातून सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनाचा लाभ जनतेनी घ्यावा, असे आवाहन केले. प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी डॉ.म्हैसेकर यांनी बल्लारपूर उपविभागीय कार्यालयाच्या कक्षेत पाच तलाठी साजे, एक महसूल मंडळ व १७ ग्रामपंचायतीचा समावेश असून यामार्फत जातीचे प्रमाणपत्र, क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व जमिनीचे वर्ग दोनचे एकमध्ये परावर्तीत करण्याचे कामे सुलभ होणार असल्याचे माहिती त्यांनी दिली.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दुर्गा आत्राम, प्रफुल्ल कांबळे, दिव्ययानी गणफाडे यांना जातीचे प्रमाणपत्र तर शत्रुघ्न नगराळे यांचा १३ मे रोजी वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी शकुंतला नगराळे एक लाख ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा धनादेशाचे वितरण करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
कोठारी येथे २०१८ मध्ये तालुका होणार
विधानसभा निवडणुकीत कोठारी येथील जाहीर सभेत तहसील कार्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. प्राप्त स्थितीत नायब तहसील कार्यालय सुरू आहे. कोठारीला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. आपण दिलेल्या वचनाची पूर्तता करतो. २०१८ मध्ये कोठारीला तालुका निश्चित होणार, असे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथील उपविभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. त्याचप्रमाणे चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार असून राज्यातील अन्य महाविद्यालयापेक्षा उत्तम दर्जाचे राहणार असल्याचे सांगून माझ्यावर राजीनामा देण्याची पाळी येणार नसल्याचे नाव न घेता नरेश पुगलिया यांना प्रतिउत्तर दिले.
बामणी(दुधोली) येथील कार्यकर्त्यांचा असंतोष पोलिसांनी शांत केला
बामणी(दुधोली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत रिलायन्स कंपनीचे टॉवर उभारण्यात येत आले. याला तेथील रहिवाशांचा विरोध आहे. यावर प्रशासन डोळेझाक करीत आहे. अन्याय दूर करण्यासाठी येथील नागरिकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांना घेराव करण्याचा बेत पिडीत नागरिकांनी आखला होता. मात्र कार्यक्रमात व्यत्यय नको म्हणून पोलीस निरीक्षक नरूमणी तांडी यांनी उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या लक्षात आंदोलनकर्त्याशी चर्चा करून शांत केले. तरीही येत्या मंगळवारपर्यंत मोबाईल मनोऱ्यावर प्रशासनाने तोडगा न काढल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा बामणी (दुधोली) येथील अन्यायग्रस्त नागरिकांनी दिला.