मुख्याध्यापकाच्या ‘दांडी’मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
By Admin | Updated: August 27, 2015 01:18 IST2015-08-27T01:18:13+5:302015-08-27T01:18:13+5:30
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दमपूर मोहदा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी हे या-ना त्या कारणाने वारंवार आजारी रजेवर जात असल्याची ओरड...

मुख्याध्यापकाच्या ‘दांडी’मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
तब्बल तीन महिने आजारी रजा : अधिकाऱ्याकडून मुख्याध्यापकाची पाठराखण
चंद्रपूर: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दमपूर मोहदा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी हे या-ना त्या कारणाने वारंवार आजारी रजेवर जात असल्याची ओरड गावकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे शाळेची प्रशासकीय व शैक्षणिक कामे वारंवार खोळंबून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
मागील शैक्षणिक सत्रात शौचालय बांधकामासाठी शासनाकडून ९५ हजार चा निधी प्राप्त झाला होता. परंतु त्यांनी शौचालय बांधकाम पूर्ण न करता निधीची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. याप्रकरणात केंद्र प्रमुख व संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे कळते. त्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष आहे.
षटकोनी इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. त्याची आतापर्यंत कुठलीही डागडूजी झालेली नाही. तरीसुद्धा त्याच इमारतीत वर्ग बसवण्याचे तोंडी आदेश मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुखांनी शिक्षकांना दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळेतील संगणक कक्षाची अतिशय दुरावस्था झाली आहे. संगणक बंद स्थितीत असून धूळ खात पडून आहेत. मुख्याध्यापकांनी संगणक दुरुस्तीची कुठलीही तसदी घेतली नाही. मुलांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था नाही. शालेय पोषण आहाराचा दर्जा पूर्णपणे घसरला आहे. जेवणात भाजीपाल्याचा अजिबात पत्ता नसतो.
साठा नोंदवहीत खूप मोठी तफावत असल्याची माहिती आहे. तसेच शालेय अभिलेखे शाळेत न ठेवता स्वत:च्या घरी ठेवतात. शैक्षणिक साहित्य निर्मिती अनुदान गेल्या पाच वर्षापासून शिक्षकांना वाटप केलेले नाही. मागील सत्रात दोन विद्यार्थ्यांच्या बनावट स्वाक्षरी करुन आदिवासी शिष्यवृत्ती हडप करण्यात आल्याचीही माहिती आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष पसरलेला आहे.
सदर मुख्याध्यापक मागील शैक्षणिक सत्रात शाळेच्या सुरुवातीलाच म्हणजे ३० जून २०१४ ते ४ आॅगस्ट २०१४ पर्यंत आजारी रजेवर होते. त्यानंतर त्याच सत्रात १५ डिसेंबर २०१४ ते ६ मे २०१५ पर्यंत तब्बल सात महिने आजारी रजेवर होते. ते ७ मे २०१५ म्हणजेच सत्राच्या शेवटच्या दिवशी शाळेत स्वत:हून हजेरी पटावर स्वाक्षरी करुन रुजू झाले. यावरून ते कामचुकारपणा करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. तरीसुद्धा त्यांच्या सेवा पुस्तकात आठ महिन्यांच्या अर्जीत रजा शिल्लक नसतानाहीसुद्धा त्यांच्या आजारी रजा कालावधीतील वेतन बील काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे पाणी नक्कीच कुठेतरी मुरले, असा नागरिकांना संशय येत आहे. त्यामुळे सदर मुख्याध्यापकाची जिल्हा परिषद प्रशासनाकडून कठोर चौकशी व्हावी, यांच्यावर कठोर कारवाई करुन त्यांच्यावर तडका- फडकी बदली करण्यात यावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)