आधार कार्डसाठी विद्यार्थ्यांची भटकंती
By Admin | Updated: July 20, 2015 00:57 IST2015-07-20T00:57:05+5:302015-07-20T00:57:05+5:30
पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधारकार्ड काढणे बंधनकारक असल्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे.

आधार कार्डसाठी विद्यार्थ्यांची भटकंती
पालकांत चिंता : अनेकांना आधारची प्रतीक्षा
चंद्रपूर : पहिली ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधारकार्ड काढणे बंधनकारक असल्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, आता आधार कार्ड काढायचे झाल्यास जिल्ह्यात काही ठिकाणी आधार नोंदणी केंद्र नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडत असून पालकही चिंतेत आहेत.
आधारकार्डची सक्ती असली तरी ते काढायचे कुठे, असा प्रश्न पालकांकडून व्यक्त होत आहे. आधारकार्डचा क्रमांक विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्रमांकाशी जोडला जावा असा शासनाचा मानस आहे. त्यासाठी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून आधार गठीत करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. शालेय स्तरावर आधारची सक्ती केली जात आहे. मात्र केंद्राअभावी आजही बहुतेक पालक विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढता आलेले नाही. २०१४-१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश शाळेत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी शाळेने संपूर्ण डाटा जमा केला होता. काही शाळेत फोटोसुद्धा काढण्यात आले. तरीसुद्धा अद्यापपर्र्यंत ‘त्या’ विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळालेले नाही. याचा शाळेनेसुद्धा पाठपुरावा संबंधितांकडे केलाच नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
चंद्रपूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी दोन वर्षांपासून आधारकार्ड काढले आहे. मात्र अद्यापही त्यांचे आधारकार्ड घरापर्यंत पोहोचलेच नाही. प्रत्येक जण पोस्टात जाऊन चौकशी करीत आहे. मात्र उपयोग होत नाही. अनेकांनी आता इंटरनेटवरून आपले तात्पूरते कार्ड डाऊनलोड केले आहे. त्याचा भूर्दंड सोसावा लागत आहे.