आधारकार्डपासून विद्यार्थ्यांची मुक्ती

By Admin | Updated: August 25, 2015 01:18 IST2015-08-25T01:18:49+5:302015-08-25T01:18:49+5:30

शालेय शिक्षण विभागाने सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचा अध्यादेश काढला

Student release from Aadhar card | आधारकार्डपासून विद्यार्थ्यांची मुक्ती

आधारकार्डपासून विद्यार्थ्यांची मुक्ती

चंद्रपूर : शालेय शिक्षण विभागाने सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र, अपुऱ्या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढणे अशक्य झाले. यामुळे शालेय शिक्षण विभागाने हा अध्यादेश मागे घेत आधारकार्ड सक्तीचे नसल्याचे परिपत्रक काढले आहे. यामुळे पालकांची फरपट थांबणार आहे. सप्टेंबरपासून ० ते ५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची टॅबवर नोंद केली जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांमध्ये शिष्यवृत्ती, गणवेश, पुस्तक आणि परीक्षा अर्ज भरण्यासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची आधारकार्ड काढण्यासाठी धावपळ सुरू होती. यातून अंगणवाड्यांमध्येसुद्धा आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. ही संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाच्या नियंत्रणात होती. मात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत असलेले आधारकार्ड केंद्र अपुरे आहेत. यामुळे आधारकार्डसाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या रांगा लागत. आधार कार्ड काढण्याची यंत्रणा अपुरी पडत असल्याने याची दखल घेत, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी एक परिपत्रक काढले आहे.
यामध्ये आधारकार्ड सक्तीचे नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे सरलमधून शालेय विद्यार्थ्यांचा आधारकार्ड सक्तीचा स्टार काढण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या आदेशाने पालकांची होणारी हेळसांड थांबणार आहे. सप्टेंबरपासून ० ते ५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी टॅबच्या मदतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्याकरिता असे टॅब मागविण्यात आले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

नोंदणी केंद्रांची संख्या वाढवावी
४जिल्ह्यात अनेक नागरिकांना आधार कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे आधार कार्डसाठी नागरिकांची आताही धावपळ सुरू आहे. अशातच ज्या ठिकाणी केंद्र सुरू आहे, त्या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक जाऊ शकत नाही. तिथे गेलेच तर लवकर नंबर लागत नाही. त्यामुळे मानसीक त्रास सहन करत तासन्तास उभे राहावे लागत असते. याची प्रशासनाने दखल घेऊन ग्रामीण भागात आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शेकडो नागरिक
आधारविना
४जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी काढलेले आधार कार्ड अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. पोस्टाची दिरंगाई की कंपनीनेच आधार कार्ड पाठविले नाही, हे कळायला मार्ग नाही. आधार कार्ड येत नसल्याने अनेकांनी ई-आधार काढून काम भागविणे सुरू केले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आधार काढलेल्या पावतीवरील क्रमांकावरून आधार कार्ड काढले जात आहे. यामुळे नागरिकांचे काम होत असले तरी मूळ आधार कार्डची अनेकांना प्रतीक्षा आहे. त्यासाठी ते पोस्टाचे उंबरठे झिजवित असल्याचे शहरापासून ग्रामीण भागापर्यंत दिसून येत आहे.

Web Title: Student release from Aadhar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.