सीटीपीएसची वीज निर्मिती बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:42 IST2018-04-01T23:42:19+5:302018-04-01T23:42:19+5:30

चंद्रपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणात अतिशय कमी जलसाठा शिल्लक आहे. त्यातून चंद्रपूरकरांनाच पाणी मिळणे कठीण होत आहे. असे असतानाही चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे संच बंद करण्यात आलेले नाही. येत्या १५ ते २० दिवसात पाणीसाठा संपण्याच्या स्थितीत पोहोचणार आहे.

Stop the power generation of the CTPS | सीटीपीएसची वीज निर्मिती बंद करा

सीटीपीएसची वीज निर्मिती बंद करा

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार यांचा इशारा : अन्यथा तीव्र आंदोलन उभारू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणात अतिशय कमी जलसाठा शिल्लक आहे. त्यातून चंद्रपूरकरांनाच पाणी मिळणे कठीण होत आहे. असे असतानाही चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे संच बंद करण्यात आलेले नाही. येत्या १५ ते २० दिवसात पाणीसाठा संपण्याच्या स्थितीत पोहोचणार आहे. त्यामुळे सीटीपीएसची वीज निर्मिती तुर्तास बंद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. असे न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
किशोर जोरगेवार यांनी इरई धरणातील जलसाठ्याची रविवारी पाहणी केली. साठा चिंताजनक दिसून आल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त मागणी केली.
मनपाकडून आमसभा घेण्यात आली होती. पण त्यामध्ये पाण्यासारखा गंभीर प्रश्न चर्चेलासुद्धा घेण्यात आला नाही. या विषयाकडे लोकप्रतिनिधी व शासन-प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. चंद्रपूरची भूजल पातळी कमी झाली आहे. अनेक ठिकाणच्या विहिरी, बोअरिंगच्या पाण्याची पातळी तळाशी गेल्याने पाणीसुद्धा मिळणे कठीण झाले आहे. इरई धरणात २०२.०५० मीटर इतके पाणी शिल्लक आहे.
धरणाची क्षमता ३६ एम.एम. क्युबिक मीटर इतकी आहे. चंद्रपूर शहराला दर महिन्यात फक्त एक एम.एम. क्युबिक मीटर पाणी वापरासाठी लागते. असे असतानाही मनपा प्रशासन शहरातील जनतेला पाणी देऊ शकत नाही आहे. जोपर्यंत महाऔष्णिक विद्युत केंद्र बंद करणार नाही, तोपर्यंत जनतेला पाणी मिळणार नाही.
पाण्याच्या विषयावर बोलण्यास वीज केंद्रातील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही जोरगेवार यांनी केला. मे महिन्यापर्यंत पाणी पुरेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्ष धरणाची पाहणी केली असता तसे वाटत नाही. त्यामुळे वीज केंद्रातील संच तत्काळ बंद करावे, अशी मागणी असल्याचेही ते म्हणाले.
...तर जून महिन्यापर्यंत पुरणार पाणी
सध्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातील चार संच चालू आहेत. इतर संच बंद करण्यात आले आहे. आता जे संच चालू आहे, ते पुन्हा चालू असले तर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाºयांच्या माहितीनुसार एक महिन्यापर्यंत शहरातील जनतेला पाणी पुरवठा होऊ शकतो. पूर्ण संच बंद ठेवले तर जून महिन्यापर्यंत शहरातील जनतेला सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकतो. जनतेला पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागणार आहे, असेही किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

Web Title: Stop the power generation of the CTPS