इरई पुनरूज्जीवनाला आजपासून प्रारंभ
By Admin | Updated: April 9, 2016 01:29 IST2016-04-09T01:29:57+5:302016-04-09T01:29:57+5:30
चंद्रपूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या पुनरूज्जीवनाचा कार्यक्रम वित्तमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आला आहे.

इरई पुनरूज्जीवनाला आजपासून प्रारंभ
८४ कोटींचा खर्च : सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कामाला शुभारंभ
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या पुनरूज्जीवनाचा कार्यक्रम वित्तमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आला आहे. ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता दाताळा गावाकडे जाणाऱ्या इरई नदीवरील पुलाशेजारी या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर राहतील. आ. नाना शामकुळे, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ३१ जानेवारीला झालेल्या जलपरिषदेदरम्यान जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांना त्यांनी यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. डॉ. सिंह यांनी यात लक्ष देण्याबाबत ना. मुनगंटीवार यांना आश्वस्त केले आहे.
त्यानुसार हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
या कामाकरिता अंदाजे ८४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामांकरिता तांत्रिक सल्लागार नेमला जाणार आहे. शहरालगतच्या नदीच्या पात्रातील गाळ काढण्याच्या कामासाठी वेकोलिने निधी दिला असून त्यानुसार पडोली पुल ते चोराळा पुलापर्यंत गाळ काढण्याच्या कामाला यापूर्वीच सुरूवात करण्यात आलेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)