जिल्ह्यातील २२६ गावांमध्ये किटकनाशकांची फवारणी
By Admin | Updated: June 26, 2015 01:12 IST2015-06-26T01:12:41+5:302015-06-26T01:12:41+5:30
हिवतापाकरिता संवेदनशील असलेल्या २२६ गावांत कीटनाशक फवारणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २२६ गावांमध्ये किटकनाशकांची फवारणी
चंद्रपूर : हिवतापाकरिता संवेदनशील असलेल्या २२६ गावांत कीटनाशक फवारणी करण्यात येणार आहे. यासाठी २२ पथके तयार करण्यात आली आहेत.
आरोग्य सभापती ईश्वर मेश्राम यांनी अलिकडेच बैठक घेऊन हिवताप विभागाचा आढावा घेतला. कीटनाशक फवारणी योग्य प्रमाणात होण्याकरिता वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता देखरेख ठेवणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कीटनाशकांची १०० टक्के फवारणी प्रत्येक घराघरांतून होण्याकरिता फवारणीचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे. ज्या गावात कीटनाशक फवारणी होणारे आहे. तेथील नागरिकांनी आपल्या घरात फवारणी करुन घ्यावी. डासांची मादी तिच्या वजनाच्या दीडपट रक्त शोषण करते. रक्त शोषण केल्यानंतर उडून जाऊ शकत नसल्याने घेतलेल्या रक्ताचे पचन होईपर्यंत भिंतीवरच राहते. त्यामुळे भिंतीला लागलेला पावडर डासांच्या पायाला लागून डास मरतात. त्यामुळे घरामध्ये १०० टक्के फवारणी करुन घेणे आवश्यक आहे. डास अंधाऱ्या खोलीत व सूर्यप्रकाश नसलेल्या खोल्यात लपून बसतात. त्यामुळे अशा अडचणीच्या जागी १०० टक्के फवारणी करुन घ्यावी. कीटकनाशकाची फवारणी झाल्यानंतर अडीच ते तीन महिने पावडरचा भिंतीवर परिणाम राहत असल्याने त्या सारवू नये. येणाऱ्या फवारणी पथकाला पूर्णपणे सहकार्य करुन घरे योग्यप्रकारे फवारुन घेतल्यास हिवताप व इतर आजारावर नियंत्रण ठेवता येते. (शहर प्रतिनिधी)