वारसा असूनही नागभीड तालुका पर्यटनात मागेच
By Admin | Updated: September 30, 2015 01:36 IST2015-09-30T01:36:38+5:302015-09-30T01:36:38+5:30
एखाद्या तालुक्याच्या विकासात पर्यटनाचा फार मोठा वाटा असतो. नशिबाने नागभीड तालुक्याला पर्यटनाचा फार मोठा वारसा

वारसा असूनही नागभीड तालुका पर्यटनात मागेच
-घनश्याम नवघडे ल्ल नागभीड
एखाद्या तालुक्याच्या विकासात पर्यटनाचा फार मोठा वाटा असतो. नशिबाने नागभीड तालुक्याला पर्यटनाचा फार मोठा वारसा आहे. पण या पर्यटनस्थळाच्या विकासाची जबाबदारी कोणीच उचलत नसल्याने हे पर्यटन स्थळ जैसे थे आहेत.
नागभीड तालुक्यात घोडाझरी, नागभीड येथील शिवटेकडी, मोहाळी येथील पांडव गुफा, बाळापूर येथील गायमुख, गोविंदपूर येथील सात बहिणींचे डोंगर आदी पर्यटनस्थळे आहेत. घोडाझरी येथे तर बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातून पर्यटक नेहमीच येथे येत असतात.
घोडाझरी सारखा निसर्गरम्य परिसर पूर्व विदर्भात दुसरा नाही. पण या स्थळाच्या विकासाच्या दृष्टीने शासन कोणतेच प्लॅनिंग करीत नाही. येथे वर्षभर गर्दी होत असली तरी पर्यटकांच्या निवासाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे सकाळी घोडाझरीत आलेल्या पर्यटकाला सायंकाळी इच्छा नसुनही परत जावे लागते. या ठिकाणी सुसज्ज कॉटेजची नितांत गरज आहे.
१०७ वर्षापूर्वी इंग्रजांनी येथे एक विश्रामगृह बांधले होते. ते आता पार मोडकळीस आले आहे. या विश्रामगृहाची साधी डागडुजीसुद्धा गेल्या अनेक वर्षात झाली नाही हे खरोखरच घोडाझरीचे दुर्दैव म्हणावे लागेल. घोडाझरी सोबतच नागभीड येथील शिवटेकडीसुद्धा एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. येथील मॉर्निंग वॉक या संघटनेने लोकसहभागातून लाखो रुपयांची कामे केली आणि शिवटेकडीच्या विकासात भर घातली असली तरी शासनस्तरावर जे प्रयत्न व्हायला पाहिजेत, ते मात्र शिवटेकडी संदर्भात होताना दिसत नाही. नागभीड तालुक्यातच बाळापूरजवळ गायमुख हे तीर्थक्षेत्र आहे. भूगर्भातून अव्याहत पाण्याचा झरा वाहत असल्याने या स्थळाला गायमुख हे नाव पडले आहे. बाळापूर येथील एका कुटुंबाकडे या स्थळाची मालकी असल्याने या स्थळाचा विकासच झाला नाही. याच गोष्टी गोविंदपूर जवळील सातबहिणीच्या डोंगराला आणि मोहाळाजवळच्या पांडव गुंफेला लागू पडतात. मोहाळी येथील पांडव लेणी तर रामायणकालीन आहेत.
राजकारण्यांची अनास्था
येथे पांडव वनवासात असताना मुक्कामी होते अशी आख्यायिका आहे. पण या स्थळाकडे आजवर कोणाचेच लक्ष गेले नाही ही या स्थळाची शोकांतिका आहे.सध्या महाराष्ट्रात सत्तारूढ असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी याबाबींचा पाठपुरावा केला तर नागभीड तालुक्यातील पर्यटनाच्या विकासात निश्चितच भर पडू शकते.