गुन्हेगारीला अंकुश घालण्यासाठी विशेष पथक तयार करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:10+5:302021-02-05T07:39:10+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर हा शांतप्रिय जिल्हा अशी ओळख असताना गुन्हेगारी व अवैध व्यवसायात वाढ झाली. हत्याकांड, ...

गुन्हेगारीला अंकुश घालण्यासाठी विशेष पथक तयार करावे
चंद्रपूर : चंद्रपूर हा शांतप्रिय जिल्हा अशी ओळख असताना गुन्हेगारी व अवैध व्यवसायात वाढ झाली. हत्याकांड, दारू व रेती तस्करी सर्रास सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथक तयार करण्याची मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे भेटीदरम्यान केली.
यावेळी माजी आमदार ॲड. संजय धोटे, अरुण मस्की, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, विनायक देशमुख, दिलीप वांढरे, गौतम यादव उपस्थित होते. राजुरा येथे राजू यादव या कोळसा वाहतूकदाराची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. काही महिन्यापूर्वी सूरज बहुरिया नामक व्यक्तीवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मनोज अधिकारी यांची हत्या झाली, अशा दुर्दैवी घटना सलग घडत असताना गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे. माजरी, नांदा फाटा, बल्लारशा, राजुरा-सास्ती, दुर्गापूर या ठिकाणी बाहेर राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नागरिकांनी गुन्हेगारीचा हैदोस घातला, याकडेही माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी लक्ष वेधले. माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात वाढलेली गुन्हेगारी व नागरिकांमधील दहशतीबद्दल खंत व्यक्त केली.