चार लाख हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी

By Admin | Updated: May 29, 2015 01:36 IST2015-05-29T01:36:30+5:302015-05-29T01:36:30+5:30

दुष्काळ व अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी पून्हा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.

Sowing will be done on four lakh hectare area | चार लाख हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी

चार लाख हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी

चंद्रपूर : दुष्काळ व अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी पून्हा नव्या जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. कृषी विभागाने चार लाख ७७ हजार ६५५ हेक्टरवर खरीप हंगाम पेरणीचे नियोजन केले असून बियाणे व खतांचे नियतन मंजूर करून घेतले आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक क्षेत्रावर पेरणी होणार आहे.
खरीप हंगामाला काही दिवसांत सुरूवात होणार असून शेतकरी हंगामपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. उन्हाचा पार अद्यापही कमी झालेला नसला तरी शेतकरी कामात व्यस्त असून मृग नक्षत्रात पाऊस झाल्यास पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. यावर्षी खरीप हंगामात भात, ज्वारी, तृणधान्य, तूर, मुंग, उडीद, कडधान्य, अन्नधान्य, भुईमुंग, तीळ, सोयाबीन, एरंडी, गळीतधान्य, कापूस, ऊस पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात चार लाख ७७ हजार ६५५ हेक्टरवर होणाऱ्या पेरणीद्वारे ६८९ लाख ४ हजार क्विंटल उत्पन्न होणार असल्याचे कृषी विभागाने खरीपपूर्व आराखड्यात म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षात नुकसानीला सामोरे जाऊन जाऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकरी अद्यापही खचलेला नसून नव्या जोमाने तयारीला लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस शेतकरी बाळगून आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. दुबार पेरणी करताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही.
विशेष म्हणजे, २०१३ आणि २०१४ असे सातत्याने दोन वर्ष शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. २०१३ मध्ये तर खरिपात शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. २०१४ मध्ये थोडेफार उत्पन्न झाले. मात्र नुकसान टळू शकले नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
१५४० लाख क्विंटल सरासरी उत्पन्नाची आशा
यावर्षीच्या खरीप हंगामात १५४० लाख क्विंटल सरासरी उत्पन्न होण्याची आशा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने यावर्षीच् चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे. मात्र गतवर्षीच पावसाने दगा दिल्याने यावर्षी तरी हवामान खात्याचा अंदाज खरे ठरेल का, अशी चर्चा शेतकऱ्यांत आहे.
१० हजार मेट्रिक टन खताची गरज
यंदा कृषी विभागाने खरिपासाठी एक लाख १० हजार ५० मेट्रीक टन खताची मागणी केली आहे. शासनाने एक लाख १० हजार २०० मेट्रिक टन खते जिल्ह्यासाठी मंजूर केले आहे. यातील २४ हजार ७८८ मेट्रिक टन खते कृषी विभागाला प्राप्त झाले आहे. येत्या दोन दिवसात आणखी सात हजार मेट्रिक टन खत येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी सांगितले. खतांची पुढे चिंता नसल्याचे सांगण्यात येत आहे. खताची उचल करून तालुका अनेक ठिकाणी पाठविण्यात आले आहे.

Web Title: Sowing will be done on four lakh hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.