रस्त्याविनाच ग्रामपंचायतीचे सामाजिक वनीकरण
By Admin | Updated: December 20, 2014 00:59 IST2014-12-20T00:59:53+5:302014-12-20T00:59:53+5:30
मूल तालुक्यातील भेजगाव ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून शेकडो हेक्टर शेतजमिनीत वनराई फुलवली.

रस्त्याविनाच ग्रामपंचायतीचे सामाजिक वनीकरण
भेजगाव : मूल तालुक्यातील भेजगाव ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून शेकडो हेक्टर शेतजमिनीत वनराई फुलवली. मात्र या सामाजिक वनिकरणात चारचाकी वाहने व मजूर वर्ग जाण्याकरिता रस्ताच नसल्याने सामाजिक वनीकरणात जाण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी ग्रामपंचायतीचे लाखोंचे नुकसान होत आहे.
भेजगाव ग्रामपंचायतीने गावाच्या शेकडो एकर चराई जमिनीवर सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर अंतर्गत सा.व. परिक्षेत्र मूल मार्फत सन १९८८ मध्ये स.क्र. १८९, ४१, ३६४ व ३६८ वर प्रति हेक्टर १६०० रोपे याप्रमाणे विविध प्रजातीच्या रोपाची लागवड करण्यात आली. आता हे रोेपवन उत्कृष्ट असून ग्रामपंचायतीमार्फत रोपवनाला संरक्षण दिले जात आहे.
त्याचप्रमाणे सन १९८९ ला स.क्र. ३२५ मध्ये ८ हेक्टर क्षेत्रावर सामाजिक वनीकरण मूलद्वारा रोपवनाची योजना मंजूर करून शिसू १५८, केसीर ४१४४, सिरस १८२२ असे मिळून एकूण १२ हजार ८०० रोपाची लागवड केली व शासकीय नियमाप्रमाणे ते रोपवन ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आले आहे. रोपवनाला ग्रामस्थाचे सहकार्य लाभत असून रोपवनातील गवत, चारा व इतर लाकूड ग्रामपंचायतीच्या परवानगीने घेण्यात येते. दोन्ही रोपवने यशस्वी झाल्याने ग्रामपंचायतीने पुन्हा गावातील १४ हेक्टर चराई जागेवर रोपवन घेण्याकरिता सामाजिक वनिकरण विभागाला ठराव दिला. त्यानंतर १९९१ मध्ये मिश्र प्रजातींची १८ हजार ४०५ रोपवने लावण्यात आली. ग्रामपंचायतीने या रोपवनाच्या देखभालीकरिता महिन्याकाठी हजारो रुपये खर्च करून एक चौकीदार नेमून देखभाल करणे सुरू केले आहे. या रोपवनाचे जंगलात रुपांतर झाले आहे. मात्र या रोपवनात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. (वार्ताहर)