जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस
By Admin | Updated: August 12, 2015 00:44 IST2015-08-12T00:44:24+5:302015-08-12T00:44:24+5:30
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अन्य भागातही मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार ...

जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस
जनजीवन विस्कळीत : रस्त्यावर पाणी तुंबले, नागरिकांचे हाल
चद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अन्य भागातही मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस कोसळला. सुमारे एक ते दीड तास बरसलेल्या या पावसाने चंद्रपूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सखोल भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झालेत. जवळपास दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने दुचाकीधारकांना रस्त्यावरच वाहने उभी करून सुरक्षित स्थळ गाठावे लागले.
सायंकाळी ४ वाजतानंतर मात्र पाऊस ओसरला. सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी १२ वाजतानंतर आकाशात ढगांनी गर्दी केली. दुपारी १.३० वाजता मुसळधार पाऊस सुरू झाला. तो तब्बल एक ते दीड तास कोसळला. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी चंद्रपूर शहरातील सखल भागात पाणी साचल्याने या पाण्यात दुचाकी वाहने फसली. पाण्यातून वाहन बाहेर काढता येत नसल्याने अनेकांनी रस्त्यावरच वाहने उभी केली आणि जवळचा निवारा शोधला. नेहमीप्रमाणे आझादबागेलगतचे वाहनतळात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पावसामुळे पिकांनाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. सोयाबीन, कपाशी, धान आदी पिकांसाठी हा पाऊस संजीवनी देणारा ठरला. हा पाऊस जिल्ह्यातील कोरपना, भद्रावती, वरोरा, जीवती, सिंदेवाही, घुग्घूस, मूल, गोंडपिपरी, राजुरा, पोंभुर्णा, सावली, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर आदी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कोसळला. (प्रतिनिधी)