रोजगार नसल्याने सहा हजार मजुरांचे हात रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:55+5:30
२३ मार्चपासून बांधकामाशी निगडीत कामे बंद करण्यात आली. २२ एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले. पण, नियमांच्या धास्तीने बांधकाम बंद आहेत. शहरातील मजुरांच्या दृष्टीने येथील बुधवारच्या आठवडी बाजाराचे अत्यंत महत्त्व आहे. पण वस्तु विकत घ्यायला पैसा नाही. कामच नाही तर कंत्राटदाराला पैसे मागायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

रोजगार नसल्याने सहा हजार मजुरांचे हात रिकामे
सचिन सरपटवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला. सोशल डिस्टन्सच्या सूचना असल्याने अनेकांनी अद्याप कामे सुरू केली नाही. त्यामुळे जगायचे कसे या विवंचनेत असणाऱ्या शहरातील सुमारे सहा हजार मजुरांचे हाल होत आहेत.
२३ मार्चपासून बांधकामाशी निगडीत कामे बंद करण्यात आली. २२ एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाले. पण, नियमांच्या धास्तीने बांधकाम बंद आहेत. शहरातील मजुरांच्या दृष्टीने येथील बुधवारच्या आठवडी बाजाराचे अत्यंत महत्त्व आहे. पण वस्तु विकत घ्यायला पैसा नाही. कामच नाही तर कंत्राटदाराला पैसे मागायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. घरात भाजीपाला, तिखट-मीट नाही, अशी परिस्थिती आहे. रेशन दुकानात धान्य आहे पण ते घेण्यासाठी पैसे नाही. काही मजुरांना कंत्राटदारांनी मदत केली. नंतर मात्र आम्हाला काम द्यावे, अशी मजुरांची मागणी होती. ज्या कंत्राटदारांनी मदत केली नाही त्या मजुरांची स्थिती तर अधिकच बिकट होती. बांधकाम व्यवसायातील गवंडी, टाईल्स लावणारे, इलेक्ट्रीक फिटींग व नळ फिटींग करणारे, वेल्डींग, सुतार, पेटींग काम करणाऱ्या मजुरांची परिस्थितीही वाईट आहे. शहरात सुमारे सात ते आठ हजार मजूर आर्थिक विवंचनेत आहेत.
उधारीवरचे जगणे
घरी पैसे नसल्याने मुलांच्या गरजा कशा भागवायच्या. इकडून तिकडून उधारीने पैसे मागून दिवस ढकलणे सुरू आहे, अशी व्यथा सुरक्षा नगर येथील ललिता लांबोळे यांनी मांडली. निराधार असूनही बँकेत पैसे जमा झाले नाही, अशी खंत उषा खोबरे यांनी व्यक्त केली. लॉकडाऊनमुळे शहरातील मजुरांच्या जगण्याचे प्रश्न अधिकाधिक गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम सुरू झाले तरच त्यांच्या हाताला काम मिळू शकेल.
कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मजुरांची परिस्थिती हलाखीची आहे. बांधकाम साहित्याचे भाव वाढले. याचा व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला. साहजिकच मजुरांना काम नसल्याने सरकारने मदत केली पाहिजे.
- सुनील पोटदुखे, बांधकाम व्यावसायिक, भद्रावती