सहा सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो
By Admin | Updated: August 4, 2016 00:52 IST2016-08-04T00:52:19+5:302016-08-04T00:52:19+5:30
जून महिन्यापासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत.

सहा सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो
समाधानकारक पाऊस : आतापर्यंत ८९९.६८ मिमी पावसाची नोंद
चंद्रपूर : जून महिन्यापासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील १२ सिंचन प्रकल्पापैकी ६ सिंचन प्रकल्पांनी १०० टक्के पाण्याची पातळी गाठली आहे.
यामध्ये आसोला मेंढा, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, दिना प्रकल्पांचा समावेश आहे. उर्वरित प्रकल्पांमध्येही समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे. यात त्यानुसार इरई ८१.९८ दलघमी, घोडाझरी ८२.९१ दलघमी, अंमलनाला ७१.२३ दलघमी, पकड्डीगुड्डम ६१.१२ दलघमी, डोंगरगाव ८३.७६, लाल नाला येथे ६९.६७ दलघमी जलसाठ्याची नोंद करण्यात आली आहे.
१ जूनपासून तर १ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ४९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानुसार सरासरी पाऊस ८९९ मिमी एवढा पाऊस जिल्ह्यात पडला. सोमवारी पडलेल्या पावसाची एकूण सरासरी १५७.३९ मिमी एवढी नोंद करण्यात आली. यामध्ये जिवती तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. यानुसार जिल्ह्यात सरासरी १०.४९ मिमी पाऊस कोसळला. मागील महिन्यांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून अत्यल्प जलसाठा राहत असल्याची स्थिती सिंचन प्रकल्पांची होती. मात्र यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)