सिंदेवाही तालुका ५० वर्षांपासून जलसिंचन योजनेच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: May 19, 2016 00:43 IST2016-05-19T00:43:59+5:302016-05-19T00:43:59+5:30
सिंदेवाही तालुका गेल्या ५० वर्षांपासून जलसिंचन योजनेच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यात सिंचनाची मोठी समस्या आहे.

सिंदेवाही तालुका ५० वर्षांपासून जलसिंचन योजनेच्या प्रतीक्षेत
हुमन प्रकल्प थंडबस्त्यात : गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम अपूर्ण
बाबुराव परसावार सिंदेवाही
सिंदेवाही तालुका गेल्या ५० वर्षांपासून जलसिंचन योजनेच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यात सिंचनाची मोठी समस्या आहे. या तालुक्यात अनेक लहान-मोठे तलाव असूनही या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात जलसिंचनाची व्यवस्था न झाल्यामुळे शेतकरी पाण्याअभावी आपल्या शेतीचा विकास करू शकले नाही. परिणामी या तालुक्यातील शेतकरी दरवर्षी अवर्षणाच्या प्रभावाखाली येवून दिवसेदिवस कर्जबाजारी होत आहे.
काही शेतकऱ्यांनी शेती विकणे सुरू केले आहे तर काही शेतकऱ्यांनी दुसऱ्यास भाडेपट्टीने शेती देणे सुरू केले आहे. या तालुक्यातील भात शेती निसर्गाच्या भरवशावर अवलंबून आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीला तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांच्या समस्याकडे महाराष्ट्र शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उजव्या कालव्याचे (नहराचे) बांधकाम गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतजमिनीला सिंचनाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन १९८२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते झाले होते. उजव्या कालव्याची लांबी १०३ किलोमीटर असून या कालव्यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा तलावात जमा होणार आहे. परंतु उजवा कालवा कारगाटा जंगलापर्यंत येवून बंद पडला. सर्व यंत्रसामग्री दोन वर्षांपासून धूळखात पडली आहे. लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती निर्माण करू शकणारी ही योजना १९९० मध्ये पूर्ण करावी, अशी अपेक्षा असताना निधीअभावी काम रेंगाळत आहे. करोडो रुपयांच्या जलसिंचन योजना केव्हा पूर्ण होणार? या प्रकल्पाचे भवितव्य काय? हा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकल्पामुळे सिंदेवाही तालुक्यातील १८ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. वर्षानुवर्षे दुष्काळ व दारिद्रयाला तोंड देणाऱ्या सिंदेवाही तालुक्याला सुखी व समृध्द करण्यासाठी ही योजना फळदायी ठरणारी आहे. परंतु हा प्रकल्प रेंगाळत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतजमीन सिंचनाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पाने विदर्भाच्या जनतेच्या आशा कमालीच्या वाढवून दिल्या. मात्र प्रत्यक्षात मुख्य धरणाचे काम सोडल्यास उजव्या नहराचे काम बंद पडले आहे.
गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य धरणाला ३३ दरवाजे आहेत. नहराअभावी धरणातील शेतजमिनीला पाणी सोडणे बंद आहे. धरण पाहिल्यास धरणामागे अथांग पाणी समुद्रासारखे दिसते. गोसेखुर्द प्रकल्पात पाणी असूनही शेतकऱ्यांच्या जमिनी मात्र कोरडे आहे. हे विदर्भातील शेतकऱ्यांचे दुदैव आहे.
हुमन सिंचन प्रकल्प थंडबस्त्यात
सिंदेवाही तालुक्यातील १९८७ मधील ४०० कोटी खर्च करून साकार होणारा हुमन सिंचन प्रकल्प ३५ हजार हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा करणारा आहे. परंतु वन विभागाने परवानगी दिली नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्प लागून असल्याने या प्रकल्पाचे काम होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंदेवाही तालुक्यात जलसिंचनाच्या समस्या अद्यापही कायम असून या तालुक्याच्या नशिबी केवळ प्रतीक्षाच आली आहे. हुमन सिंचन प्रकल्पाचे सिंदेवाही व नवरगाव उपविभाग कार्यालय इतरत्र हलविण्यात आले आहेत. आतापर्यंत केंद्रीय वन खात्याकडून हुमन सिंचन प्रकल्पास मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. या प्रकल्पामुळे जी जमीन नहराखाली जाईल, त्या जागेवर वृक्ष लागवड करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. परंतु अजूनपर्यंत हुमन सिंचन प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. ३० वर्षाचा कालावधी होवूनही हुमन सिंचन प्रकल्प पूर्ण झाला नाही. एकंदरीत या तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ आश्वासनावर जीवन जगावे लागत आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या ब्रह्मपुरी जवळील गराडी जलसेतूच्या दुरुस्तीच्या कामाकरिता १६ कोटी रुपये आणि वाघोली बुटी उपसा सिंचन योजनेचे पाणी लोंढोली व साखरी परिसरातील पाच ते सात गावाच्या शेताकरिता पाणी उपलब्ध होण्यासाठी तसेच नहराची दुरुस्ती करण्याकरिता २ कोटी ९० लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामाकरिता गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सिंदेवाही तालुक्यातील शेतजमिनीला मिळणार आहे.
- विजय वडेट्टीवार, आमदार तथा उपगटनेते, ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र